
पिंपरी-चिंचवड महापालिकेत 128 जागांपैकी 125 जागांवर नगरसेवक निवडून येतील, असा दावा भाजपचे निवडणूक प्रमुख, आमदार शंकर जगताप यांनी केल्यानंतर अजित पवार गटाचे शहराध्यक्ष योगेश बहल यांनी जगतापांना उत्तर दिले आहे. राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकांना पक्षात घेताना ईव्हीएम मशीनमध्ये दोन ते अडीच हजार मते आपोआप मिळतील, असे भाजपकडून सांगितले जात असल्याचा खळबळजनक आराेप बहल यांनी शनिवारी (दि.27) केला. राज्यातील सत्तेमधील राष्ट्रवादीकडून ईव्हीएमबाबत गंभीर आराेप केल्यामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. बहल यांच्या आरोपामुळे शहरातील राजकारण ऐन थंडीत तापण्याची चिन्हे आहेत.
राज्यातील सत्तेत सहभागी असलेले भाजप आणि अजित पवार गट पिंपरी-चिंचवड महापालिकेची निवडणूक स्वबळावर लढत आहे. या दाेन्ही पक्षांमध्ये माजी नगरसेवकांच्या फोडाफोडीवरुन आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. भाजपने शंभरहून अधिक नगरसेवक निवडून आणण्याचा नारा दिला होता. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माजी नगरसेवक राहुल कलाटे यांच्या पक्ष प्रवेशावेळी भाजपचे निवडणूक प्रमुख, आमदार शंकर जगताप यांनी 128 पैंकी 125 नगरसेवक भाजपचे निवडून येतील, असा दावा केला. या दाव्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाने जाेरदार पलटवार केला आहे.
योगेश बहल म्हणाले, भाजपचे विधानसभेचे दोन आणि विधानपरिषदेचे दोन असे चार आमदार आहेत. प्रत्येक आमदार 25 नगरसेवक निवडून आणेल असे भाजप नेतृत्वाला वाटत असेल. त्यामुळे शंभरपारचा भाजपकडून नारा दिला जातो. त्याला आमची हरकत नसून शुभेच्छा आहेत. भाजपने 128 पैंकी 125 नगरसेवक निवडून आणण्याचा नारा दिला आहे. भाजपने मतदान यंत्र सेट केले आहे का, असे विचारले असता योगेश बहल म्हणाले, भाजपने ईव्हीएम सेट केले आहे का, हे त्यांनाच माहिती आहे. मात्र, पक्षात घेणाऱ्या माजी नगरसेवकांना मतदान यंत्रामध्ये दोन ते अडीच हजार मते आपोआप मिळतील, असा आराेप बहल यांनी केला आहे. तुम्ही आमच्याकडे या बाकीची सर्व मदत करण्याचे आश्वासन भाजप नेत्यांकडून दिले जात असल्याचेही बहल म्हणाले.
… तर मी कायमचे राजकारण साेडेन
शहरातील 32 प्रभागापैकी सात ते दहा प्रभागांमध्ये भाजपचा एकही उमेदवार निवडून येणार नाही. अजित पवार गटाचे दहा माजी नगरसेवक भाजपमध्ये गेल्याने भाजपकडून डोळे झाकून 125 जागा निवडून येतील असा दावा केला जात आहे. मात्र,अतिआत्मविश्वास, घमंडीत भाजप आहे. शंभर जागा मिळविणेही भाजपसाठी कठिण आहे. भाजपच्या 125 जागा आल्या, तर मी कायमचे राजकारण सोडेन, असेही बहल यांनी म्हटले. तर भाजपच्या फाेडाफाेडीला शहरातील जनताच उत्तर देईल, असेही ते म्हणाले.






























































