कोल्हापूर मनपाच्या बायोगॅस प्रकल्पातून वीजनिर्मिती

kolhapur municipal corporation kmc biogas plant waste to energy project

कोल्हापूर महानगरपालिकेच्या महत्त्वाकांक्षी असलेल्या ओल्या कचऱ्यापासून बायोगॅस व त्यातून विद्युतनिर्मिती प्रकल्पातून आता प्रत्यक्ष वीजनिर्मिती सुरू झाली आहे. स्वच्छता, पर्यावरण संरक्षण आणि खर्च बचत, या दृष्टीने हा प्रकल्प महत्त्वाचा ठरणार आहे.

कोल्हापूर शहरातून दररोज सरासरी 280 ते 300 टन कचरा संकलित केला जातो. यामधील सुमारे 100 ते 120 टन ओला कचरा भाजीमंडई, हॉटेल वेस्ट तसेच घरगुती कचऱयापासून वेगळा करून कसबा बावडा येथील झूम कचरा प्रक्रिया प्रकल्पात आणला जातो. या ठिकाणी महानगरपालिकेचे एकूण दोन बायोगॅस प्रकल्प कार्यरत आहेत. यापैकी 30 टीपीडी क्षमतेचा बायोगॅस प्रकल्प सन 2019 मध्ये उभारण्यात आला असून, स्वच्छ भारत मिशन (टप्पा 2) अंतर्गत आणखी 20 टीपीडी क्षमतेचा नवीन बायोगॅस प्रक्रिया प्रकल्प सन 2025 मध्ये सुरू करण्यात आला आहे.

दि. 7 नोव्हेंबर 2025 रोजी उद्घाटन केलेल्या या प्रकल्पातून आता प्रत्यक्ष वीजनिर्मिती प्रक्रिया सुरू झाली असून, पहिल्या टप्प्यात 20 टीपीडी प्रकल्पावरील कन्वेअर बेल्ट, इतर यंत्रसामग्री तसेच झूम कचरा प्रक्रिया प्रकल्प परिसरातील पथदिव्यांना या वीजनिर्मिती प्रकल्पातून विद्युतपुरवठा देण्यात आला आहे.

पुढील टप्प्यात झूम कचरा प्रक्रिया प्रकल्पावरील 35 हॉर्स पॉवरपेक्षा कमी क्षमतेच्या सर्व मोटर्स या वीजनिर्मिती प्रकल्पावर कार्यरत करण्यात येणार आहेत. त्यामुळे भविष्यात केवळ प्रकल्पासाठी लागणाऱया वीज खर्चात एका वर्षात सुमारे 60 ते 70 लाख रुपयांची बचत होणार आहे.

तसेच आगामी काळात या दोन्ही बायोगॅस प्रकल्पातून निर्माण होणाऱया बायोगॅसवर आधारित कॉम्प्रेस्ड सीएनजी प्रकल्प उभारण्यात येणार असून, यामुळे महानगरपालिकेला प्रतिवर्षी अंदाजे 3 ते 4 कोटी रुपयांची बचत होणार आहे. हा संपूर्ण प्रकल्प आयुक्त तथा प्रशासक के. मंजूलक्ष्मी, अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आला आहे.