
चिपळूण तालुक्यातील पालीकडून दळवटणे येथील रामवाडी परिसरात आज (04 फेब्रुवारी 2026) दुपारी सुमारे अडीचच्या सुमारास भीषण वणवा लागल्याची घटना घडली. आगीने काही वेळातच उग्र स्वरूप धारण केल्याने परिसरात धुराचे मोठमोठे लोट पसरले होते.
या वणव्यामुळे परिसरातील आंबा कलमे तसेच इतर फळबागा आगीच्या भक्षस्थानी सापडल्या असून मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. विशेष म्हणजे नदी परिसरात चरण्यासाठी गेलेली गुरेही आगीच्या कचाट्यात अडकली होती. त्यामुळे स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
वणव्याची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्ते संदीपराव कदम, रमेश शिंदे, रमेश महाडिक, रमेश पवार, वैभवी थोरे, साक्षी मोहिते आदींनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने आग विझविण्याचे शर्थीचे प्रयत्न केले. दरम्यान, आग आटोक्यात आणण्यासाठी मदतकार्य सुरू होते . वणव्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या घटनेमुळे शेतकरी व बागायतदारांचे मोठे नुकसान झाले असून नुकसानभरपाईची मागणी होत आहे.





























































