INDIA आघाडीने सतत जागरुक रहावं , एकमेकांसोबत चर्चा कराव्या! संजय राऊत यांनी मांडली अगदी स्पष्ट भूमिका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

निवडणूका आल्या की इंडिया आघाडी वळवळू लागते. ती जिवंत आहे असं दाखवलं जातं; असं न करता देशातील महत्त्वाच्या मुद्द्यांवर इंडिया आघाडीने एकत्र येऊन चर्चा करायला हवी. ट्रम्प यांनी हिंदुस्थानला ज्या प्रकारे गुलाम बनवलंय त्यावर आतापर्यंत इंडिया आघाडीची बैठक व्हायला हवी होती, अशी स्पष्ट भूमिका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी मांडली.

सामनातील अग्रलेखाबाबत पत्रकारांनी प्रश्न विचारल्यानंतर संजय राऊत म्हणाले की, “इंडिया आघाडीचं नेतृत्व बदलणं ही काळाची गरज आहे असं मी म्हटलेलं नाही. अनेक नेत्यांचा अंतररात्म्यातील आवाज उफाळून वर आला असं म्हटलं आहे. . यात अनेक काँग्रेस नेतेही आहेत. मणिशंकर अय्यर, संजय बारू यांनी आपले मत मांडले त्यानंतर या विषयावर चर्चा सुरू झाली. लवकरच पाच राज्यातल्या निवडणूका आहेत. अशा वेळेला पाच राज्यातल्या निवडणूका व भविष्यातील लोकसभेसाठी इंडिया आघाडी मजबुतीने पुढे जाणं आवश्यक आहे. राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली लोकसभेत एक झुंज दिली जातेय. त्यामुळे राहुल गांधींना लोकसभेतूनच बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरू आहे. एवढी धास्ती त्यांची सत्ताधाऱ्यांनी घेतली आहे”, असे ते म्हणाले.

”निवडणूका आल्या की इंडिया आघाडी वळवळू लागते. ती जिवंत आहे असं दाखवलं जातं. इंडिया ब्लॉकने नेहमी जागरूक राहून एक दुसऱ्यासोबत चर्चा करून राहायला हवे. ट्रम्पने हिंदुस्थानला गुलाम केलं. त्यावर बैठक इंडिया आघाडीकडून बैठक घ्यायला हवी होती. देशात अनेक प्रश्न आहेत. शेतकऱ्यांचे, मणिपूरचा हिंसाचार, कायदा सुरक्षा व्यवस्था असे अनेक प्रश्न आहेत त्यावर चर्चा व्हायला हवी होती”, असे मत त्यांनी मांडले.

”कुणी तरी बोलतंय की इंडिया आघाडीचं नेतृत्व ममता बनर्जी यांना द्यायला हवे कुणी म्हणतंय एम के. स्टॅलिन यांना द्यावे. ममता बॅनर्जी नक्कीच राष्ट्रीय नेत्या आहेत. त्यांनी केंद्र सरकार व राष्ट्रीय तपास यंत्रणांविरुद्ध जसा लढा सुरू केला आहे त्यामुळे त्या प्रसिद्ध झाल्या आहेत. जर कुणाला हे सांगायचे असेल तर त्यांनी पुढे येऊन बैठक घ्यायला हवी. पुढे काय करायचे ते ठरवायला हवे. आम्हाला सत्ता नकोय हे चालणार नाही, आम्हाला सत्ता हवी आहे. आम्ही सारखे पराभूत होऊ चालेल असं जर कुणी बोलत असेल तर नाही, आम्हाला सत्ता हवी आहे. कार्यकर्त्यांना सत्ता हवी आहे”, असे संजय राऊत यांनी स्पष्ट केले.