
केंद्र सरकारने मुख्य विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसला २४, अकबर रोड येथील त्यांचे मुख्यालय येत्या शनिवारपर्यंत रिकामे करण्याची नोटीस दिल्याचे समजते. याबाबत काँग्रेसने अधिकृत माहिती दिली नसली तरी दिल्लीच्या राजकीय वर्तुळात याची जोरदार चर्चा रंगली आहे.
२४ अकबर रोड येथील बंगल्यावर गेल्या ४८ वर्षांपासून काँग्रेसचे मुख्यालय आहे. अनेक ऐतिहासिक निर्णयांचा हा बंगला साक्षीदार आहे. गेल्या वर्षी काँग्रेसने कोटला मार्ग येथील ‘इंदिरा भवन’ या आपल्या नवीन मुख्यालयाचे उद्घाटन केले होते. मात्र, नवीन वास्तूत गेल्यानंतरही अकबर रोड येथील जुन्या कार्यालयाचा वापर सुरूच होता.
केंद्रसरकारने केवळ मुख्य कार्यालयच नाही, तर ५, रायसिना रोड येथील भारतीय युवा काँग्रेसचे कार्यालय देखील रिकामे करण्यास सांगितले आहे. या नोटिशीमुळे काँग्रेसमध्ये अस्वस्थता असून, या विरोधात काँग्रेस न्यायालयाचे दरवाजे ठोठावणार असल्याचे समजते.
गेल्या वर्षी सोनिया गांधी यांनी नवीन मुख्यालयाचे उद्घाटन केले तेव्हा अनेक ज्येष्ठ नेत्यांनी अकबर रोडच्या आठवणींना उजाळा दिला होता. या वास्तूशी कार्यकर्त्यांचे भावनिक नाते आहे.

























































