
रत्नागिरी जिल्हा परिषद सभापती पदाची निवडणूक आज पार पडली. निवडीनंतर दालनात जाताच सभापती घामाघूम झाले. शिक्षण सभापती, कृषी सभापतींच्या दालनातील वातानुकूलित यंत्रणा बंद होती. आज सभापती निवड होणार हे माहित असतानाही जिल्हापरिषद प्रशासनाने देखभाल दुरुस्तीकडे लक्ष दिले नसल्याचे निदर्शनास आले आहेत.
रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या सभापती पदाची निवडणूक आज बिनविरोध पार पडली. निवडून आल्यानंतर सर्व सभापती आपल्या दालनात गेले. उन्हाळ्याचे दिवस असल्याने प्रचंड उकाडा होता. जिल्हा परिषद सभापती दालनातील वातानुकूलित यंत्रणा ठप्प झाली होती. कृषी व पशुसंवर्धन सभापती महेश नाटेकर यांच्या दालनातील एकमेव एसी बंद पडल्याने सभापतींसह सर्वजण घामाघूम झाले. शिक्षण सभापती नंदकुमार मुरकर यांच्या दालनातील एसी बंद होता, त्यामुळे घामाघूम अवस्थेत त्यांना शुभेच्छा स्वीकाराव्या लागल्या होत्या. समाजकल्याण सभापती ॲड. सुयोग कांबळे यांच्या दालनातील एसी सुरू असल्याचा आवाज करत होता. प्रत्यक्षात मात्र दालनातील वातावरण उष्ण होते. केवळ महिला व बालकल्याण सभापती मयुरी शिर्के यांच्या दालनातील दोन्ही एसी सुरू असल्याने अनेकांनी त्याठिकाणी बसणे पसंद केले.




























































