महाराष्ट्रात बाबांची गर्दी वाढतेय – शरद पवार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महाराष्ट्रात बाबांची गर्दी वाढतेय. एका बाजूला शाहू-फुले-आंबेडकर म्हणायचे आणि दुसरीकडे लोकप्रतिनिधीच अशा बाबांकडे जात असतील तर हे चिंताजनक असल्याचे सांगत राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भोंदूबाबा खरात प्रकरणावरून राज्यातील नेत्यांचे कान टोचले.

राज्यात सध्या सुरू असलेल्या अशोक खरात प्रकरणासंदर्भात पत्रकारांनी प्रश्न केला असता शरद पवार म्हणाले, आज महाराष्ट्रामध्ये चिंता वाटावी असे चित्र आहे. कारण खरात बाबानंतर मी काल वाचले की आणखी कुणीतरी बाबा आलाय. आणि आज वाचले की कोणीतरी मंत्री आज बाबा आणायला चालले आहेत. महाराष्ट्रात बाबांची गर्दी होत असून हे चिंताजनक असल्याचे त्यांनी सांगितले.

तुम्ही मला कधीपासून ओळखता? कधी गंडा हातात आहे, कुठे काही आहे का? मी दोन-तीन ठिकाणी जातो. पंढरपूरला गेलो की, पांडुरंगाचे दर्शन घेतो. तुळजापूरला गेलो की, तुळजाभवानीचे दर्शन घेतो. माझी काही महत्त्वाची योजना असेल, निवडणूक असेल, तर कान्हेरी गावात मारुतीचे दर्शन घेतो, पण त्याची जाहिरात करत नाही, असे शरद पवार म्हणाले.

महाराष्ट्रासाठी हे अशोभनीय

माझ्या वाचनात आले की, ‘कोणी किती कॉल केले. त्यामध्ये अनेकांची नावे आहेत. त्या अनेकजणांमध्ये समाजात किंवा राजकारणात एक स्थान भूषवणारे लोकही आहेत. हे चित्र महाराष्ट्राला अशोभनीय आहे’, असे शरद पवार म्हणाले.