
पश्चिम बंगाल किंवा अन्य राज्यांमध्ये निवडणूक आयोग ज्या पद्धतीने वागत आहे त्याच्यामुळे लोकशाहीवर हल्ला होत असून निवडणूक आयोग लोकशाहीची विटंबना करत आहे, असे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत म्हणाले. निवडणूक आयोगाने आपल्या कार्यलयावर भाजपचा झेंडा फडकवावा, असा टोलाही राऊत यांनी गुरुवारी सकाळी माध्यमांशी बोलताना लगावला.
मतदार फेरतपासणी प्रक्रियेतील घोळाची व निवडणूक अधिकाऱ्यांच्या बदल्यांची तक्रार करण्यासाठी गेलेल्या खासदारांच्या शिष्टमंडळाचा निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी अपमान केल्याचा गंभीर आरोप तृणमूल काँग्रेसने केला. ‘पश्चिम बंगालमध्ये नियुक्त करण्यात आलेल्या भाजपशी संबंधित निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती देताच ज्ञानेश कुमार भडकले आणि आम्हाला ‘गेट लॉस्ट’ म्हणाले,’ असे खासदार डेरेक ओब्रायन यांनी सांगितले. याबाबत विचारलेल्या प्रश्नाला संजय राऊत उत्तर देत होते.
ते पुढे म्हणाले की, तृणमूल काँग्रेसचे शिष्टमंडळ भेटायला गेल्यावर मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार हे त्यांच्याशी अत्यंत उद्धटपणे वागले. गेट लॉस्ट, चालते व्हा अशा प्रकारची भाषा चार खासदार असलेल्या शिष्टमंडळाला तुम्ही वापरता याचा अर्थ तुम्ही भाजपमध्ये विलीन झाला आहात. तुमच्या कार्यालयावर भाजपचा झेंडा फडकवा. भाजप राष्ट्रीय आणि राज्य स्तरावर जो जाहीरनामा प्रसिद्ध करतो त्यात त्यांनी निवडणूक आयोगाच्या कार्याचाही उल्लेख करावा. निवडणूक आयोग ही आमची अंगीकृत संघटना असल्याचे त्यांना जाहीर करावे.
देश के गद्दारोंको
जुते मारो सालोंको
(चुनाव आयोग को श्रद्धांजली) https://t.co/bcpyPhZvJm— Sanjay Raut (@rautsanjay61) April 8, 2026
महिला आरक्षणा संदर्भात संसदेचे विशेष सत्र बोलावण्यात आले आहे. याबाबत बोलताना संजय राऊत म्हणाले की, भाजप, मोदी-शहा हे सगळे काही आपल्या मनाप्रमाणे बदलू इच्छितात. लोकसभेच्या आता 800 हून अधिक जागा असणार आहेत, तर महाराष्ट्रात 400 हून अधिक आमदार असतील. नवीन विधान भवन कधी बनेल आणि तोपर्यंत लोक कुठे बसणार हे खूप मोठे रहस्य आहे. पण आले मोदींच्या मनात…. जेव्हा बोलायचे असते तेव्हा ते गप्प बसतात आणि क्रेडिट शाहबाज शरीफ, मुनीर घेऊन जातात, असा टोलाही संजय राऊत यांनी लगावला.
नरेंद्र मोदी 16, 17, 18 एप्रिलला संसदेत महिला आरक्षण विधेयक आणत आहेत. महिलांना त्यांचे न्याय, हक्क, जबाबदाऱ्या देण्यासंदर्भात भाषणबाजी करताहेत. पण त्यांना हे सांगायला पाहिजे की, अशा प्रकारे महिलांना त्यांचे हक्क देणारा महाराष्ट्र पहिले राज्य आहे. शरद पवार मुख्यमंत्री असताना त्यांना महिला आरक्षणाचे पहिले पाऊल टाकले होते. त्या महाराष्ट्रामध्ये आज भाजपच्या राजवटीमध्ये जागोजागी बुवा, महाराज उदयला येत आहेत आणि हे सगळे भाजपचे प्रचारक आहेत. या सगळ्यांचा भाजपशी आणि भाजप नेत्यांचा या सगळ्यांची संबंध आहे, असे राऊत म्हणाले.




























































