नियोजनाअभावीच उत्तरेत नैसर्गिक आपत्तींचा फटका; दिल्ली, पंजाब, हरयाणातील पूरस्थितीवरून आदित्य ठाकरे यांची केंद्रावर टीका

उत्तर हिंदुस्थानातील दिल्ली, पंजाब, हरयाणा, जम्मू-कश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमधील पूरस्थितीमुळे सामान्य नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यावरून शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारवर टीका केली आहे. उत्तरेतील पूरस्थिती ही नैसर्गिक आपत्ती नव्हे तर प्रशासकीय नियोजनातील गंभीर त्रुटींचा परिणाम आहे, असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे.

आदित्य ठाकरे यांनी ‘एक्स’वर केलेल्या पोस्टमधून पूरस्थितीवरून केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. उत्तर हिंदुस्थानातील अनेक राज्ये सध्या निसर्गाच्या प्रकोपाला सामोरे जात आहेत. या संकटात सापडलेल्या सर्व नागरिकांप्रती माझी सहानुभूती आहे, असे आदित्य ठाकरे यांनी नमूद केले आहे. सरकारने योग्य नियोजन न केल्यामुळेच नागरिकांना या नैसर्गिक आपत्तीचा फटका बसत आहे, असे त्यांनी पुढे म्हटले आहे.

केंद्र सरकार, राज्य सरकारांना आणि या भागातील जनतेला आवश्यक ती सर्व मदत देईल, अशी आशा आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केली आहे. ‘ही आपत्ती आता दशकातून एकदा घडणारी घटना राहिलेली नाही. प्रत्येक राज्याला या हवामान संकटाचा सामना करावा लागत आहे. डोंगरफोड, झाडांची कत्तल, नद्यांचे मार्ग बदलणे आणि इतर अनेक कृतींचा हा थेट परिणाम आहे’ अशा शब्दांत त्यांनी सरकारचे लक्ष वेधले आहे.

हवामान बदलाविरोधात ठोस पावले उचला

आता केवळ तत्काळ बचाव, मदत आणि नुकसानभरपाई पुरेशी नाही. हिंदुस्थान आणि हिंदुस्थानींच्या भविष्यासाठी हवामान बदलाविरोधात ठोस पावले उचलायला हवीत, अशी गरज आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केली आहे.