समृद्धीमुळे भ्रष्टनाथ शिंदेंची समृद्धी झाली पण रस्ता खड्ड्यात गेला, आदित्य ठाकरे यांची टीका

शिवसेना( उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, युवासेनाप्रमुख, आमदार यांनी आज वरळी कोळीवाडा येथील पविमोचनेश्वर मंदिराला भेट देऊन तेथील पूजेत सहभागी झाले. वरळी कोळीवाड्यातील काही रहिवासी गेल्या अनेक वर्षांपासून अमरनाथ यात्रेला जात आहेत व तेथे जाण्यापूर्वी या मंदिरात शिव शंकराची पूजा केली जाते.

या पूजेनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना आदित्य ठाकरे यांनी मराठीचा मुद्दा व समृद्धी महामार्गावरून राज्य सरकारला फटकारले आहे. ” भाजपचा मराठी व महाराष्ट्राकडे बघण्याचा दृष्टीकोण बघा. धारावी खाली करण्याचा त्यांचा हाच हेतू आहे की त्यांना मुंबईकर मुंबईत नकोयत. पोलीस कॅम्पमधल्या रिटायर पोलिसांना तिथून काढण्याचा प्रयत्न करतायत. धारावी खाली करण्याचा प्रयत्न करतायत. धारावीतील 80 टक्के लोकं अपात्र ठरवले गेले. आम्ही मुंबईत जे मराठी रंगभूमीचं दालन करत होतो ते यांनी रद्द केलं आहे”, असे आदित्य ठाकरे म्हणाले.

बबनराव लोणीकरांनी केलेल्या वादग्रस्त विधानवर बोलताना आदित्य ठाकरे यांनी भाजपला फटाकरले, ” लोणीकर यांनी केलेले वक्तव्य हा फक्त लोणीकरांचा विचार नाही तर संपूर्ण भाजपचा विचार आहे. हे मनातलं विष लोणीकरांच्या माध्यमातून समोर आलं आहे. अशा वृत्तीला मत द्यायचं की नाही हे लोकांनी ठरवायचं”‘, असे आदित्य ठाकरे म्हणाले.

समृद्धी महामार्गावरील खड्ड्यांवरूनही आदित्य ठाकरे यांनी महायुती सरकारवर टीका केली. ” समृद्धी महामार्गाच्या मागच्या महिन्यात उद्घाटन झालेल्या रस्त्याला खड्डे पडले आहेत. समृद्धीमुळे भ्रष्टनाथ शिंदेंची समृद्धी झाली पण रस्ता खड्ड्यात गेला”, असा सणसणीत टोला आदित्य ठाकरे यांनी लगावला आहे.