एल्फिन्स्टन ब्रीज बंद झाल्याने वाहतुकीची कोंडी, वाहतूक खोळंबा रोखण्यासाठी अधिक प्रमाणात पोलीस तैनात करा; आदित्य ठाकरे यांची मागणी

एल्फिन्स्टन पूल बंद केल्यामुळे होणारा संभाव्य वाहतूक खोळंबा रोखण्यासाठी अधिक प्रमाणात वाहतूक पोलीस तैनात करण्यात यावे, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी केली आहे. त्यांनी मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती यांना पत्र लिहून ही मागणी केली आहे.

मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती यांना लिहिलेल्या पत्रात आदित्य ठाकरे म्हणाले आहेत की, “एमएमआरडीएने एल्फिन्स्टन फ्लायओव्हर बंद केला असून, यामुळे मोठ्या प्रमाणात आजू बाजू परिसरात मोठी वाहतूक कोंडी होणार आहे. त्यातच सायन पूल आणि लोकमान्य टिळक पूलाचे काम अद्याप अपूर्ण असल्याने अधिक गैरसोय होऊ शकते.”

त्यांनी पत्रात पुढे लिहिलं आहे की, “आधीच मुंबई पोलीसांवर प्रचंड ताण आहे, याची मला कल्पना असताना, मी आपणास विनंती करतो की, आपण महत्त्वाच्या पूर्व-पश्चिम जोडमार्गावर तसेच विशेषतः माहिम, दादर, वरळी, शिवडी परिसरात अधिक प्रमाणात वाहतूक पोलीस तैनात करावेत. अन्यथा, एमएमआरडीए व महानगरपालिका यांच्यातील नियोजन आणि समन्वयाच्या अभावामुळे मुंबईकरांच्या वाहतुकीसाठी परिस्थिती अतिशय गंभीर होईल.”