भुयारी मेट्रो गाळातच! वरळीतील आचार्य अत्रे चौक स्थानक अनिश्चित काळासाठी बंद, प्रवाशांनी मेट्रो सेवेकडे फिरवली पाठ

पहिल्याच पावसात बुडालेली भुयारी मेट्रो मंगळवारीही गाळातच अडकलेली होती. आचार्य अत्रे चौक स्थानक सलग दुसऱ्या दिवशी बंद ठेवले होते. या स्थानकावरील प्रवासी सेवा अनिश्चित काळासाठी बंद राहणार आहे. महायुती सरकारच्या ‘चमकोगिरी’साठी बीकेसी ते आचार्य अत्रे चौक स्थानक मेट्रो सेवेच्या उद्घाटनाला केलेली घाई नडल्याचे यातून स्पष्ट झाले आहे. पावसाने सरकारच्या अपयशाची पोलखोल केल्याने मंगळवारी अनेक प्रवाशांनी भुयारी मेट्रोकडे पाठ फिरवली.

मुसळधार पावसाने मंगळवारी मुंबईला चांगलेच झोडपले. पालिकेसह सर्व सरकारी यंत्रणांचे अपयश चव्हाटय़ावर आले. यात अलीकडेच लोकार्पण केलेल्या भुयारी मेट्रो मार्गाच्या कामातील सरकारचा बेफिकीरपणा समोर आला. सोमवारी आचार्य अत्रे चौक स्थानकात शिरलेल्या पाण्याने मोठय़ा प्रमाणावर गाळ आत गेला आहे. हा गाळ, चिखल आणि घाणीचे साम्राज्य हटवण्याचे काम मंगळवारी सुरू होते. गाळाचे प्रमाण अधिक असल्याने आचार्य अत्रे चौक मेट्रो स्थानक प्रवासी सेवेसाठी पुन्हा कधी खुले होईल याचे उत्तर मेट्रो प्रशासनाकडे नाही. हे स्थानक अनिश्चित काळ बंद राहणार असल्याचे प्रशासनाने म्हटले आहे. त्यामुळे मोठा गाजावाजा करून आचार्य अत्रे चौक स्थानकापर्यंत सुरू केलेली भुयारी मेट्रोची सेवा वरळी स्थानकापर्यंत चालवण्याची नामुष्की प्रशासनावर ओढवली आहे. आचार्य अत्रे चौक स्थानकातील गाळ आणि घाणीचे साम्राज्य हटवले जाईपर्यंत भुयारी मेट्रोची सेवा आरे जेव्हीएलआर ते वरळीदरम्यान चालवण्यात येणार आहे. दरम्यान, मुंबई मेट्रोच्या व्यवस्थापकीय संचालिका अश्विनी भिडे यांनी आचार्य अत्रे स्थानक लवकरच कार्यरत केले जाईल, असे म्हटले आहे.

लोकल सेवा दुसऱ्या दिवशीही विलंबाने

सोमवारी पहिल्या पावसाच्या दणक्याने विस्कळीत झालेली मुंबईची लोकलसेवा दुसऱ्या दिवशीही पूर्वपदावर आली नाही. मंगळवारी दुपारपर्यंत मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावर लोकल जवळपास 15 ते 20 मिनिटे उशिराने धावत होत्या. त्यात प्रवाशांची रखडपट्टी झाली. मान्सूनच्या दमदार हजेरीने सोमवारी संपूर्ण दिवसभर उपनगरी रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले होते. त्यात तिन्ही मार्गांवर 100 हुन अधिक लोकल फेऱ्या रद्द कराव्या लागल्या. रुळावर जागोजागी साचलेले पाणी ओसरण्यास वेळ लागल्याने त्याचा मंगळवारी सलग दुसऱ्या दिवशी लोकलच्या वेळापत्रकावर परिणाम दिसून आला. मध्य रेल्वेसह पश्चिम रेल्वे मार्गावर दुपारपर्यंत लोकल 15 ते 20 मिनिटे उशिराने धावत होत्या. मंगळवारी पहाटे उपनगरात पावसाचा जोर अधिक होता. उशिराने धावणाऱ्या लोकल गाडय़ांमुळे नोकरदार मंडळींचा कामाच्या ठिकाणी ‘लेटमार्प’ लागला.

इतर भुयारी स्थानकांतही पाणी साचण्याची भीती

मेट्रो मार्गिकेलगत मिठी नदीचा प्रवाह आहे. 26 जुलै 2005च्या जलप्रलयात मुंबईतील या भागात प्रचंड पाणी साचले होते. त्यामुळे या परिसरातील भुयारी मेट्रो स्थानकात पाणी साचण्याची भीती आहे.

इंडिकेटरवर घोळ; प्रवासी संभ्रमात

आरे जेव्हीएलआर ते वरळीपर्यंत मेट्रो सेवा सुरू ठेवली. मात्र मेट्रो स्थानकांतील इंडिकेटरवर गंतव्य स्थानकाच्या जागी आचार्य अत्रे चौकचेच नाव झळकत होते. त्यामुळे प्रवासी संभ्रमात सापडले.

मोदींचे सल्लागार आले, पण बुडालेले स्थानक नाही पाहिले!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सल्लागार तरुण कपूर मंगळवारी मुंबईत आले होते. त्यांनी सध्या सुरू असलेल्या पायाभूत प्रकल्पांचा आढावा घेण्यासाठी निर्माणाधीन काळबादेवी मेट्रो स्थानकाला भेट दिली. त्यानंतर ते वरळी मेट्रो स्थानकात गेले. तेथून त्यांनी बीकेसी स्थानकापर्यंत मेट्रो प्रवास केला. मात्र सोमवारी पावसात बुडालेल्या आचार्य अत्रे चौक स्थानकाकडे ते फिरकले नाहीत.