
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे सरकार असताना मुंबईत 500 चौरस फुटांपर्यंतच्या घरांचा मालमत्ता कर कोणत्याही अटी-शर्ती न घालता माफ करण्यात आला. मात्र आता भाजप-मिंधेंच्या सत्ताकाळात मुंबईकरांवर लवकरच ‘अदानी कर’ लादण्यात येणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त कर लादणे व विनाकारण मुंबईकरांना कराच्या बोजाखाली अडकवून ठेवणे हेच भाजपचे तंत्र असल्याचा घणाघात शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केला.
मुंबई महानगरपालिकेने नुकतीच मालमत्ता करात वाढ केली आहे. तर आता ‘वेस्ट मॅनेजमेंट फी’च्या नावाखाली ‘अदानी कर’ लादण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे आदित्य ठाकरे यांनी ‘एक्स’वर स्पष्ट केले. या ‘अदानी करा’ला आम्ही सातत्याने विरोध करीत आलेलो आहोत. कारण हा कर थेट मुंबईकरांवर लादला जाणार आहे, जेणेकरून देवनार डंपिंग ग्राऊंड साफसफाईवर होणारा 2500 कोटींचा खर्च अदानी समूहासाठी मुंबईकरांच्या खिशातून भरता येईल, असेही आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे.
महानगरपालिकेने मालमत्ता कर वाढवल्यामुळे तूर्तास ‘वेस्ट मॅनेजमेंट फी’ स्थगित केली आहे. रद्द केलेली नाही. हा कर मुंबईकरांवर लादला जाणार आहे. मुंबईकरांवर कराचे बोजा लादण्याचेच भाजपचे तंत्र आहे. या ‘अदानी करा’ला मी सातत्याने विरोध करीत आलो आहे, असे शिवसेना नेते आदित्य ठाकरे म्हणाले.