स्थानिकांना विश्वासात घेऊन मगच निर्णय घ्या; मुंबईतील प्रस्तावित जेट्टीबाबत आदित्य ठाकरेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र

गेटवे ऑफ इंडिया ते रेडिओ क्लब यामधल्या भागात होणाऱ्या प्रस्तावित जेट्टीबाबत स्थानिकांना विश्वासात घेऊन, त्यांचे म्हणणे ऐकून मगच त्याविषयी निर्णय घेण्यात यावा, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्राद्वारे त्यांनी ही मागणी केली आहे.

आपल्या पत्रात आदित्य ठाकरे यांनी लिहिलं आहे की, “अलीकडेच माझी कुलाबा परिसरातील रहिवाशांशी भेट झाली, तेव्हा गेटवे ऑफ इंडिया ते रेडिओ क्लब ह्यामधल्या भागात होणाऱ्या प्रस्तावित जेट्टीबाबत त्यांची मते व त्यांना वाटणाऱ्या चिंता मला समजल्या. या प्रस्तावित जेट्टीबाबात स्थानिकांशी कोणतीही सल्लामसलत न करता, त्यांना विश्वासात न घेता काँक्रीटचे विद्रूप बांधकाम तिथे केले जाणार आहे, ज्यामुळे या ऐतिहासिक वारसा लाभलेल्या परिसराचे कधीही भरून न येणारे नुकसान होईल. असे घडण्याआधी, आपण कृपया इथल्या रहिवाशांचे म्हणणे ऐकावे व योग्य निर्णय घ्यावा, अशी मी आपणास नम्र विनंती करतो.”