अवकाळीमध्ये 16 कोटी 68 लाखांचे नुकसान

मे महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे नगर जिह्यातील शेतीपिकांसह फळबागांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानीचे पंचनामे करून जिल्हा प्रशासनाच्या वतीने 16 हजार 177 शेतकऱयांना नुकसानीपोटी 16 कोटी 68 लाख रुपयांची मागणी राज्य शासनाकडे करण्यात आली आहे. यंदा उन्हाळ्यात एप्रिल महिन्यात आधी पाणीटंचाईने उग्र रूप धारण केले. त्यानंतर मे महिन्याच्या सुरुवातीपासून जोरदार अवकाळीला जोरदार सुरुवात झाली. यात उन्हाळ्याच्या उकाडय़ापासून नागरिकांना दिलासा मिळाला असला, तरी दुसऱया बाजूला शेतकऱयांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले.

मे महिन्यात झालेल्या पावसाने जिह्यातील वेगवेगळ्या तालुक्यांतील 744 गावांतील शेतकऱयांच्या सहा हजार 521 हेक्टर क्षेत्राला अधिक फटका बसला. अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाल्यामुळे शेतामध्ये जून महिन्याच्या सुरुवातीपर्यंत पाणी साचलेले होते. परिणामी, अनेक ठिकाणच्या शेतकऱयांना खरीप हंगामासाठी शेतीची मशागत करता आली नाही. तसेच बागायती आणि फळबाग असलेल्या शेतामध्ये अनेक दिवस पाणी साचून राहिल्याने झाडांना बाधा पोहोचली. अवकाळी पाऊस झाल्यानंतर ‘महसूल’सह कृषी कर्मचाऱयांनी बांधावर जाऊन पीक पंचनामे केले. बहुतांशी ठिकाणचे वाफसे झाले नसल्यामुळे पंचनामे करण्यास विलंब झाला. संपूर्ण ठिकाणचे अचूक पंचनामा रिपोर्ट्स आल्यानंतर त्याचा अहवाल शासनास पाठविण्यात आला आहे.

अहिल्यानगर जिल्हा प्रशासनातर्फे 16 हजार 177 शेतकऱयांच्या नुकसानीपोटी 16 कोटी 68 लाख रुपयांची मागणी शासनाकडे करण्यात आली आहे. यात एक हजार 193.19 हेक्टरवरील फळपिकांचा समावेश असून, चार कोटी 29 लाख रुपये शासनाकडून अपेक्षित रक्कम आहे. शासनाच्या अटीनुसारच शेतकऱयांना आर्थिक मदत दिली जाते. नगर, अकोले, श्रीगोंदा, कर्जत तालुक्यांतील बाधित शेतकऱयांची संख्या अधिक आहे.

असा आहे फटका…

n नगर तालुका दोन हजार 263 शेतकरी, एक हजार 104.34 हेक्टर आणि झालेले नुकसान तीन कोटी 22 लाख. पारनेर 868 शेतकरी, 459.48 हेक्टर आणि झालेले नुकसान एक कोटी 25 लाख. पाथर्डी 243 शेतकरी, 106.90 हेक्टर आणि झालेले नुकसान 34 लाख. कर्जत एक हजार 802 शेतकरी, 776.96 हेक्टर आणि झालेले नुकसान दोन कोटी 18 लाख. जामखेड 718 शेतकरी 276.04 हेक्टर आणि नुकसान 76 लाख. श्रीगोंदा एक हजार 985 शेतकरी, 890.57 हेक्टर आणि नुकसान दोन कोटी 54 लाख. श्रीरामपूर 52 शेतकरी, 39.24 हेक्टर आणि नुकसान 10 लाख. राहुरी एक शेतकरी 362, 513.48 हेक्टर आणि नुकसान एक कोटी 41 लाख. नेवासा 532 शेतकरी, 365.59 हेक्टर आणि नुकसान एक कोटी दोन लाख. शेवगाव 46 शेतकरी, 20 हेक्टर आणि नुकसान पाच लाख. संगमनेर 968 शेतकरी, 523.66 हेक्टर आणि नुकसान एक कोटी 75 लाख. अकोले पाच हजार 168 शेतकरी, एक हजार 336.43 हेक्टर आणि नुकसान तीन कोटी 68 लाख. कोपरगाव 74 शेतकरी 34.46 हेक्टर आणि नुकसान नऊ लाख. राहाता 96 शेतकरी, 74.29 हेक्टर आणि नुकसान 23 लाख असे आहे.