
अहमदाबादमधील भीषण विमान दुर्घटनेत आतापर्यंत 270 मृतदेह हाती लागले आहेत. ही घटना घडल्यानंतर केंद्र आणि गुजरात सरकारने घटनेच्या 24 तासांच्या आत माहिती देणे अपेक्षित होते. मात्र घटनेच्या दोन दिवसानंतर आज दिल्लीत नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने पहिलीच पत्रकार परिषद घेऊन याबाबत माहिती दिली आहे.
नागरिक उड्डयन मंत्रालयाचे सचिव समर कुमार सिन्हा यांनी पत्रकार परिषदेला सुरुवात करताना सांगितले की, 12 जून रोजी दुपारी 1:39 वाजता हे विमान अहमदाबादहून उड्डाण केल्यानंतर अवघ्या काही सेकंदात 350 फूट उंचीवर पोहोचले, परंतु लगेचच विमान खाली येऊ लागले. या विमानात 230 प्रवासी, दोन वैमानिक आणि 10 क्रू मेंबर्स असे एकूण 242 जण होते. दुपारी 1:39 वाजता वैमानिकाने अहमदाबादच्या एटीसीला ‘MAYDAY ‘ म्हणजेच आपत्कालीन परिस्थितीची सूचना दिली. मात्र त्यानंतर एटीसीचा विमानाशी संपर्क तुटला आणि एका मिनिटानंतर विमान अहमदाबाद विमानतळापासून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या मेघाणीनगर परिसरात कोसळले.
सिन्हा यांनी पुढे सांगितले की, या विमानाने दुर्घटनेपूर्वी पॅरिस-दिल्ली आणि दिल्ली-अहमदाबाद असा प्रवास कोणत्याही अडथळ्याशिवाय पूर्ण केला होता. दुर्घटनेनंतर दुपारी 2:30 वाजता धावपट्टी बंद करण्यात आली आणि प्रोटोकॉल पूर्ण केल्यानंतर सायंकाळी 5 वाजता मर्यादित उड्डाणांसाठी ती पुन्हा सुरू करण्यात आली. दुपारी 3:30 ते 4 वाजेच्या सुमारास मंत्रालयाची संपूर्ण टीम आणि मंत्री नियंत्रण कक्षात पोहोचले, तर सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास संपूर्ण टीम घटनास्थळी उपस्थित होती.
याचबद्दल बोलताना पत्रकार परिषदेत नागरिक उड्डयन मंत्री राम मोहन नायडू म्हणाले की, गेली दोन दिवस मंत्रालयासह सर्वांसाठी अत्यंत कठीण होते. या दुर्घटनेने संपूर्ण देशाला धक्का बसला आहे. ज्यांनी या घटनेत आपल्या प्रियजनांना गमावले, त्यांच्या दुखात मी सहभागी आहे. मी स्वत: रस्ते अपघातात माझे वडील गमावले आहेत. त्यामुळे मी हे दुःख समजू शकतो,” असे ते म्हणाले.