मुंबईहून लंडनला निघालेलं ‘एअर इंडिया’चं विमान अर्ध्यातून माघारी फिरलं; प्रवाशांची धाकधूक वाढली, नेमकं काय घडलं?

गुजरातच्या अहमदाबाद येथील सरदार वल्लभभाई आंतरराष्ट्रीय विमानतळाहून लंडनच्या गॅटविक विमानतळाकडे रवाना झालेले एअर इंडियाचे विमान कोसळले. गुरुवारी दुपारी घडलेल्या या दुर्घटनेमध्ये 290 जणांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेला काही तास उलटत नाही तोच शुक्रवारी सकाळी मुंबईहून लंडनला मार्गस्थ झालेले एअर इंडियाचे विमान अर्ध्यातून माघारी फिरले. त्यामुळे विमानातील प्रवाशांना आणि त्यांच्या कुटुंबियांचीही धाकधूक वाढली होती. अखेर यावर आता ‘एअर इंडिया’कडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे.

शुक्रवारी पहाटे 5 वाजून 20 मिनिटांनी एअर इंडियाच्या AI129 या विमानाने मुंबईतून लंडनच्या दिशेने उड्डाण घेतले होते. जवळपास 3 तास हे विमान हवेमध्ये होते, मात्र त्यानंतर हे विमान पुन्हा माघारी फिरले आणि मुंबई विमानतळावर सुरक्षित उतरले. गुरुवारी अहमदाबादमध्ये झालेल्या दुर्घटनेनंतर हे विमानही अचानक माघारी आल्याने चर्चांना उधाण आले. अफवांचा बाजार उठण्याआधीच एअर इंडियाने यावर स्पष्टीकरण दिले आहे. इस्रायलने इराण केलेल्या हल्ल्यामुळे हे विमान पुन्हा माघारी फिरल्याची माहिती एअर इंडियाने एक्सवर पोस्ट करत दिली.

Air India plane crash – 5 महिन्यांपूर्वी लग्न, नवरा लंडनमध्ये डॉक्टर; नव्या संसाराची स्वप्न घेऊन ‘ती’ विमानात बसली, पण…

इस्रायलने केलेल्या हल्ल्यानंतर इराणने हवाई क्षेत्र बंद केले आहे. इराणमध्ये आणीबाणीही लागू करण्यात आली आहे. दोन्ही देशातील तणावाचे वातावरण पाहता प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी एअर इंडियाची काही विमाने वळवण्यात आली आहेत, तर काही माघारी बोलावण्यात आली आहेत. याची यादीही एअर इंडियाने जारी केली आहे. यात मुंबई-लंडन AI129 या विमानाचही समावेश आहे.