अनुबंध – कलावंतांचे वेड

>> प्रा. विश्वास वसेकर

कलावंतांच्या नजरेने आपण हे जग, निसर्ग पाहायला लागलो की, तो आहे त्याहून सुंदर वाटतो, पण कलावंतांचे प्रयत्न इतकेच मर्यादित नसतात. कल्पनेच्या पंखांनी उड्डाण करून चंद्रावरचे डाग पुसण्याची अखेर एक कविकल्पना इतकाच माफक अर्थ त्यांना नसतो. त्याच्या पुजाऊन मानवतेवरील अनेक कलंक पुसण्याचे ते महत्त्वाचे प्रयत्न करीत असतात.

1977 साली पुण्याला झालेल्या साहित्य संमेलनाच्या बाकी सगळ्या आठवणी पुसट झाल्या आहेत, परंतु बहिणाबाई चौधरी यांची एक आठवण मला तिथल्या एका खासगी भेटीत त्यांचे सुपुत्र कै. सोपानदेव चौधरी यांनी सांगितली, ती अजूनही माझ्या कानात रुणझुणत असते. सोपानदेव त्यांच्या बालपणी जळगावला त्यांच्या आईसोबत पोथीपुराण ऐकायला जायचे. रामायणामधील हनुमान जन्माची कथा ऐकून दोघे घरी परतत होते. बहिणाबाई कसला तरी विचार करीत असाव्यात.

घरी आल्यावर सोपानदेवांना त्या म्हणाल्या, ‘‘सोपाना, सुमंत प्रधानानं घोटाळा केला नाही का रे?’’ सोपानाला सुरुवातीला प्रश्नच कळला नाही. बहिणाबाईंनी पुजी मीमांसा केली ती अप्रतिमच आहे. त्या म्हणाल्या, ‘‘राम हा हनुमानापेक्षा श्रेष्ठ नाही का? हनुमान जर जन्मल्याबरोबर उगवत्या सूर्याच्या तांबडय़ा बिंबाला फळ समजून ते घ्यायला उड्डाण करू शकतो, तर राम त्यापेक्षा अधिक काही करू शकला असता! त्यानं जेव्हा आकाशातला चंद्र आणून देण्याचा हट्ट धरला तेव्हा सुमंत प्रधानानं आरसा आणून द्यायला नको होता. राम चंद्रावरच गेला असता अन् त्यानं चंद्रावरचा डागदेखील पुसून काढला असता.’’

सोपानदेवांच्या तोंडून हे ऐकताना अक्षरश माझ्या अंगावर रोमांच उभे राहिले. बहिणाबाईंचे हे अतिशय सुंदर संस्मरण कुठेही नोंदवले गेलेले नाही. मला ही आठवण ऐकवली गेली याबद्दल मी स्वतला भाग्यवान समजतो. खरंच सगळ्या कलावंतांना हे जग आहे त्याहून अधिक सुंदर करण्याचा केवळ ध्यास लागलेला असतो नाही का? त्यांच्या कलानिर्मितीमुळेच हे जग आहे त्यापेक्षा अधिक सुंदर वाटत असते.

आता बहिणाबाईंचेच उदाहरण घ्यायचे झाले तर असे म्हणता येईल की, वडाचे झाड सगळ्यांनीच पाहिले आहे. वडाच्या झाडाचे बहिणाबाईंच्या पूर्वी, त्या वेळी आणि आताही जे काय सौंदर्य आहे तेच आहे, पण त्याचे बहिणाबाईंनी जे वर्णन केले ते वाचले म्हणजे काय वाटते ते अनुभवानेच लक्षात घेऊ,

हिरवी हिरवी पानं 

लाल फळ जशी चोंच 

जणू वडाचा झाडाले 

आलं पीक पोपटाचं

हे ऐकले की, वडाचे झाड आहे त्याहून सुंदर वाटते की नाही? वसंत ऋतूमध्ये निसर्गातही नाना रंगांची होळी चाललेली असते. त्यातल्या त्यात पळस तर लाल अशा फुलांनी नुसता लडून गेलेला असतो. पळसाच्या फुलाला संस्कृतात ‘किंशुक’ म्हणतात. ‘किंशुक’ म्हणजे जणू काही पोपटच. त्या फुलाचा आकार पोपटाच्या चोचीसारखा असतो. यावर बहिणाबाई आपल्या कवितेतून म्हणतात,

‘‘या पळसावर आपल्या चोची ठेवून राघू कुठं बरं उडून गेले?’’

हा कल्पनाविलास पळसाच्या झाडालादेखील आहे त्याहून सुंदर करतो की नाही?

हे झाले प्राकृतिक सौंदर्याविषयी. कलावंतांच्या नजरेने आपण हे जग, निसर्ग पाहायला लागलो की, तो आहे त्याहून सुंदर वाटतो, पण कलावंतांचे प्रयत्न इतकेच मर्यादित नसतात. कल्पनेच्या पंखांनी उड्डाण करून चंद्रावरचे डाग पुसण्याची अखेर एक कविकल्पना इतकाच माफक अर्थ त्यांना नसतो. त्याच्या पुजाऊन मानवतेवरील अनेक कलंक पुसण्याचे ते महत्त्वाचे प्रयत्न करीत असतात. अस्पृश्यता, दारिद्रय़, निरनिराळ्या पातळीवरील विषमता आणि शोषण – हे माणुसकीच्या चंद्रावरचे डाग आहेत. ते कलंक दूर झाले की, आहे त्याच जगावर स्वर्ग उतरणार आहे.

द्रष्टे, विचारवंत, शास्त्रज्ञ, कलावंत यांचा सततचा प्रयत्न समाजाला सुधारण्याचा, जागरूक बनविण्याचा, माणूस बनविण्याचा चालला आहे. होय, माणूस बनणे ही महाकठीण अशी गोष्ट आहे. गालिब म्हणतो,

बस के दुश्वार है हर काम का आसाँ होना 

आदमी को भी मयस्सर नहीं इन्साँ होना

या जगात साधी, सोपी म्हणून गोष्टच उरली नाही. ‘आदमी’ने इन्सान व्हावे ही किती माफक अपेक्षा आहे, पण अजून तेवढे शक्य होत नाही. माणसाच्या जीवनात जेवदुःखं आहेत ना, त्यातली शोषण, अस्पृश्यता यांसारखी मानवनिर्मित दुःखं जर कमी झाली तर माणसाच्या जीवनात जरा आणि मरण याखेरीज काही दुःखंच उरणार नाहीत.

तुकारामांपासून आजच्या कवींपर्यंत प्रत्येकाचा संघर्ष समाजातील या कुप्रवृत्तींविरुद्ध चालू आहे. या कलावंतांनी जर विधायक प्रयत्न केले नसते, दुष्ट प्रवृत्तींवर प्रहार केले नसते तर समाज आणि संस्कृती मुळी शिल्लकच राहिली नसती. जेव्हा नखं वाढतात तेव्हा ती छाटून टाकायची असतात. पुन्हा ती वाली की, पुन्हा छाटायची. समाजातल्या वाईट प्रवृत्तींचंदेखील असंच आहे. त्यांना छाटण्याचे प्रयत्न वारंवार जर झाले नसते तर हे जग सडून गेलं असतं. हे सडून गेलं नाही याचं श्रेय कवींना आहे.

साहित्यातदेखील जी आंदोलनं आणि चळवळी निर्माण होतात. त्यांची मानवतेशी जी, जेवआणि जशी बांधिलकी असेल तेवय़ाच त्या रुजतात. मानवी जीवनातली सगळी कुरूपता दूर व्हावी आणि नवा आदर्श, शोषणमुक्त असा समाज निर्माण व्हावा यासाठी तर या चळवळी असतात.

आजचे दलित साहित्य विद्रोहाच्या प्रखर भाषेतून समाज उभारणीचं कार्य करत आहे. आपले विनोदी लेखक विनोदाच्या नाजूक चिमटय़ांनी समाजाचे दोष दाखवतात आणि आपण अंतर्मुख होतो. ग्रामीण साहित्य खेडय़ातल्या माणसाला आत्मप्रतिष्ठा मिळावी तसेच ‘भारत’ आणि ‘इंडिया’ यातले अंतर कमी व्हावे म्हणून प्रयत्न करताना दिसतात.

जगाला सुंदर करणे म्हणजे तरी दुसरे काय? मानवतेवरील सगळे कलंक दूर झाले की, हे जग सुंदरच होणार आहे.

(लेखक ज्येष्ठ साहित्यिक आहेत)