ठसा – दाजी पणशीकर

>> माधव डोळे

काही नावे अशी असतात की, त्यांचा उच्चार करताच आपण आपोआप नतमस्तक हातो. त्यातील एक प्रमुख नाव दाजीशास्त्री पणशीकर. धर्म, संस्कृती, कला, संत वाङ्मय, नाटय़, संगीत, काव्य, वक्तृत्व, लेखन अशा अनेक कलांची उपासना दाजीशास्त्री यांनी अखेरच्या श्वासापर्यंत केली. देशविदेशात अडीच हजारांहून व्याख्याने देण्याचा विक्रम त्यांनी केला. विशेष म्हणजे त्यांच्या व्याख्यानांना अनेक युवकही असायचे. गोव्याच्या पेडणे गावातील पणशीकर कुटुंबात 1934 साली जन्मलेल्या दाजींचे मूळ नाव नरहरी असे होते. त्यांचे वडील पं. विष्णुशास्त्री हे दशग्रंथी वैदिक. तसेच व्याकरणाचेदेखील पंडित होते. त्यांच्या घरी वेद व संस्कृत पाठशाळा होती. त्यामुळे धर्मग्रंथ, वेद, पुराणे, विविध स्तोत्रे, रामायण, महाभारत यांचा परिचय लहान वयातच झाला. आकलन शक्ती आणि पाठांतर ही दाजींना ईश्वरी देणगीच लाभली होती. वयाच्या 13 व्या वर्षी अमरकोश तोंडपाठ झाला होता. त्याशिवाय विष्णुसहस्रनाम, आदी शंकराचार्य, वासुदेवानंद सरस्वती यांची अनेक स्तोत्रे मुखोद्गत झाली.

वडील पं. विष्णुशास्त्री तसेच आजोबा पं. वासुदेवशास्त्री यांच्या संस्कारांमुळे त्यांचा वारसा दाजींनी अतिशय समर्थपणे पुढे चालवला. पांढरेशुभ्र धोतर, जॅकेट आणि खांद्यावर उपरणे घेतलेले दाजी व्यासपीठावर यायचे तेव्हा उपस्थितांमध्ये चैतन्य आणि उत्साह निर्माण व्हायचा. कोणाचेही मन न दुखवता ते आपला मुद्दा अतिशय प्रभावीपणे मांडायचे. विचारांमध्ये स्पष्टता, परखडपणा आणि शिस्त हे त्यांचे गुण अतिशय महत्त्वाचे होते. महाराष्ट्राला अनेक विचारवंतांची परंपरा लाभली आहे, पण तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या इतकेच प्रभावीपणे साहित्य-संस्कृती क्षेत्रात दीर्घकाळ काम करणाऱयांत दाजी पणशीकर यांचे नाव घ्यावे लागेल. महान संस्कृत पंडित, लेखक आणि तत्त्वचिंतक पं. श्रीपादशास्त्री किंजवडेकर हे दाजींचे गुरू होते. 1956 ते 1966 अशी दहा वर्षे त्यांचा सहवास लाभला. गुरुकुल पद्धतीने त्यांनी शास्त्रीबुवांकडे धर्मशास्त्र, रामायण-महाभारत, पुराणे, विविध प्रकारची स्तोत्रे यांचे सखोल शिक्षण घेतले. श्रीपादशास्त्री यांचे ऋण व्यक्त करताना ‘स्तोत्रगंगा’ या आपल्या पुस्तकातील मनोगतात त्यांनी म्हटले आहे…‘‘स्तोत्रे मुखोद्गत झाली खरी, पण त्यामुळे पाठांतराचाही मला गर्व होऊ लागला. स्तोत्राचा अर्थ, आशय हे समजून घ्यायचे राहिले बाजूला आणि मला मात्र अहंतेची बाधा झाली. या बाधेतून माझी मुक्तता करण्यासाठीच जणू मला गुरुवर्य पं. श्रीपादशास्त्री किंजवडेकर यांचे दर्शन झाले आणि माझे सारे वैचारिक, मानसिक आयुष्यच बदलून गेले. माझ्यातील लेखकाचा शोध गुरुवर्यांनीच लावून मला लिहिते केले.’’ दाजींनी हाती घेतलेली लेखणी एखाद्या क्रतस्थाप्रमाणे जपली. ‘श्रीभावार्थ रामायण’ (संपादित), ‘श्रीनाथांचे आठ ग्रंथ’ (संपादित), ‘महाभारत-एक सुडाचा प्रवास’, ‘कर्ण खरा कोण होता?’, ‘शब्दोत्सव’, ‘कथामृतम’, ‘कपटनीती’, ‘अपरिचित रामायण’, ‘स्तोत्रगंगा’, ‘गानसरस्वती किशोरी आमोणकर-आदिशक्तीचा धन्योद्गार’ ही त्यांची पुस्तके अतिशय गाजली. या साऱ्या पुस्तकांच्या तीसहून अधिक आवृत्या निघाल्या आहेत. ज्यांना सखोल चिंतन आणि अभ्यास करायचा असेल अशांसाठी ही पुस्तके म्हणजे अनमोल ठेवा आहेत. हे भाग्य फार कमी लेखकांच्या नशिबी असते.

दाजी पणशीकर यांनी आचार्य अत्रे यांच्या दैनिक ‘मराठा’पासून ते दैनिक ‘सामना’पर्यंत अनेक वृत्तपत्रांमध्ये मोलाचे लेखन केले. दैनिक ‘सामना’मध्ये तर विविध विषयांवर त्यांनी 16 वर्षे लेखमाला नेटाने लिहिल्या. पुस्तक रूपाने हा सर्व ठेवा वाचकांसाठी उपलब्ध आहे. दाजी पणशीकर यांच्या ‘महाभारत-एक सुडाचा प्रवास’ या पुस्तकाला नरहर कुरुंदकर यांची प्रस्तावना होती. त्यांच्यासह पं. पांडुरंगशास्त्री गोस्वामी, प्रा. रं. रा. देशपांडे, शास्त्रीय गायिका किशोरीताई आमोणकर, कविवर्य सुरेश भट, दुर्गाबाई भागवत, प्राचार्य रामभाऊ शेवाळकर, कविवर्य शंकर वैद्य, मंगेश पाडगावकर अशा महाराष्ट्राच्या विविध क्षेत्रांतील महान व्यक्तींशी त्यांचे ऋणानुबंध होते. कला, संस्कृती व परंपरेचा वारसा घराण्यात कसा रुजतो याचे उत्तम उदाहरण पणशीकरांचे देता येईल. आचार्य अत्रे यांच्या ‘तो मी नव्हेच’ या नाटकाने मराठी रंगभूमीवर इतिहास घडवणारे ज्येष्ठ नट प्रभाकर पणशीकर हे दाजींचे ज्येष्ठ बंधू. त्यांनीच स्थापन केलेल्या नाटय़संपदा या संस्थेचे व्यवस्थापक म्हणून त्यांनी अनेक वर्षे काम केले. यानिमित्ताने अनेक कलाकारांशी त्यांचा संबंध आला. दुसरे त्यांचे बंधू दिनकर पणशीकर हे जयपूर घराण्याचे प्रसिद्ध शास्त्रीय गायक होते. दाजींच्या कन्या नंदिनी बेडेकर याही गायिका असून त्या विदुषी किशोरी आमोणकर यांच्या शिष्या आहेत. पणशीकर यांचा मुलगा विक्रम हादेखील पंचांगकर्ता म्हणून प्रसिद्ध आहे. दाजींनी आपल्या प्रदीर्घ कारकीर्दीत आपल्या टिटवाळ्याच्या वास्तव्यात संस्थात्मक कार्यही केले. तेथील साहित्याचे अभ्यासक चिंतामणी कुलकर्णी, विवेक पुराणिक, प्रवीण पंडित, श्रीकांत देवधर व अन्य सहकाऱयांच्या मदतीने 1992 साली ‘जनप्रबोधिनी’ नावाची संस्था स्थापन केली. तसेच वासुदेवशास्त्री पणशीकर ग्रंथालयदेखील सुरू केले. या दोन्ही संस्था समर्थपणे कार्यरत आहेत. टिटवाळा या गावाला सांस्कृतिक चेहरा देण्याचे काम दाजी पणशीकर यांनी केले. वयाच्या 92 व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला असला तरी महाराष्ट्र त्यांची वाणी व लेखणी कधीच विसरणार नाही. ती नव्या पिढीला सतत प्रेरणा देत राहील.