मतचोरीचा मुद्दा योग्य, निवडणूक आयोगानं उत्तर द्यावं! जनता राहुल गांधींच्या पाठीशी, सी व्होटरच्या सर्व्हेतून कल स्पष्ट

मतचोरी आणि मतदार याद्यांच्या फेरतपासणीवरून लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर हल्ला चढवला आहे. राहुल गांधी यांनी बिहारमध्ये मतदार अधिकार यात्राही काढली असून त्यांना प्रचंड प्रतिसादही मिळत आहे. भाजपने महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक चोरली आणि लोकसभा निवडणुकीत मतचोरी करून विजय मिळवल्याचा गंभीर आरोप राहुल गांधी करत आहेत. राहुल गांधी यांचा हा मुद्दा योग्य असल्याचे सी व्होटरच्या सर्व्हेतून स्पष्ट झाले असून मोठ्या प्रमाणात नागरिकांना त्याला पाठिंबाही दिला आहे.

बिहारमध्ये मतदार यादीच्या फेरतपासणीच्या नावाखाली मतदारांना वगळण्यात येत असल्याचा आणि मतचोरीचा आरोप राहुल गांधी यांनी केला. याबाबत सी व्होटरने घेतलेल्या सर्व्हेची आकडेवारी समोर आली आहे. यात बहुसंख्य लोक राहुल गांधी यांच्या पाठीशी उभे राहिले आहेत. राहुल गांधी यांचा मतचोरीचा आरोप खरा मुद्दा असल्याचे 60 टक्के लोकांनी मान्य केले, तर 67 टक्के लोकांनी निवडणूक आयोगाने राहुल गांधी यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना योग्य उत्तर द्यावे असे म्हटले आहे. ‘एबीपी माझा’ने आणि ‘Vartha Bharathi’ वेब पोर्टलने याबाबत वृत्त दिले आहे.

मतदार यादीतून नावे कापली जाण्याच्या भीतीने मतदारांना ग्रासले असून लोकांच्या मनात ही भीती आहे. विरोधी पक्षांनीही मतदार यादीतून नावे कापले जात असल्याचा दावा केला आहे. पण निवडणूक आयोग याला कट म्हणत आहे. 1 सप्टेंबर रोजी फेरतपासणीनंतरची यादी प्रसिद्ध होईल, तोपर्यंत ही भीती कायम राहील, असे सी व्होटरचे यशवंत देशमुख एका युट्यूब पोर्टलशी बोलताना म्हणाले.

मतचोरी आणि मतदार यादीतून नाव कापली जात असल्याच्या मुद्द्यावर काँग्रेस आणि निवडणूक आयोगानेही ठाम भूमिका घेतली आहे. पण हे प्रकरण सोडवण्याऐवजी तणाव वाढत चालल्याचे दिसते. अर्थात समस्या प्रतिक्रियेची नाही, तर हेतूची असून संशयावर कोणताही इलाज नाही. लोकांच्या मनातील भीती दूर करणे निवडणूक आयोगाचे काम असल्याचेही देशमुख पुढे म्हणाले.