मुंबई-गोवा महामार्गावर हातिवले येथे कार-ट्रक अपघात; एकाचा मृत्यू, पाच जखमी

मुंबई-गोवा महामार्गांवर हातीवले येथील टोल नाक्यावर उभ्या असलेल्या ट्रकला महेंद्रा मराझो कंपनीच्या गाडीने जोरदार धडक दिली. या अपघातामध्ये राजेश शेखर नायडू (वय 34 रा. मालाड पश्चिम मुंबई) यांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर कारमधील अन्य पाच जण जखमी झाले आहेत. जखमींवर राजापूर रूग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना अधिक उपचारासाठी कणकवली येथे नेण्यात आले आहे असे राजापूर पोलिसांनी सांगितले.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महेंद्रा मराझो गाडी ही मुंबई, मालाड येथून कणकवली, भिरकोन्डकडे येथे नातेवाईकांकडे निघाले होते. महामार्गाने प्रवास करीत असलेल्या या गाडीमध्ये सहा प्रवासी होते. हातीवले येथील टोल नाक्यावर गाडी आली असता तेथुन पुढे उभ्या असलेल्या ट्रकला महेंद्रा मराझो गाडीने मागून जोरात धडक दिली. त्यामध्ये महेंद्रा मराझो गाडीतील राजेश शेखर नायडू यांच्या डोक्याला जबरदस्त मार लागला. तर, जखमी तृशांत सुरेश शेलार (वय 32 ), कुणाल शिवाजी साळुंखे (वय 39), हर्षदा कुणाल साळुंखे (वय 28 ), प्रीती राजेश नायडू (वय 28 ), श्राकांत नामदेव घाडगे (वय 28) सर्व रा. मालाड पश्चिम मुंबई या सार्‍यांना तातडीने राजापूर ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले. त्यामध्ये राजेश शेखर नायडू यांचा मृत्यु झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. तर, उर्वरीत सर्व जखमींवर राजापूर ग्रामीण रुग्णालयात उपचार केल्यानंतर त्यांना अधिक उपचारासाठी कणकवलीला नेण्यात आले.

दरम्यान, या अपघाताची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक अमित यादव, सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपज्योती पाटील, उपनिरीक्षक सुधीर उबाळे, मोबीन शेख व पोलीस कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी जखमींना सहाकार्य करत वाहतुक सुरळीत केली व पंचनामा केला.