
मला जेव्हा विचारलं जातं की किती नुकसान झालं, तेव्हा मी म्हणतो ते महत्त्वाचं नाही. निकाल महत्त्वाचा आहे. तुम्ही कसा प्रतिसाद देता हे महत्त्वाचे आहे. नुकसानासंदर्भात बोलणे योग्य होणार नाही. जेव्हा तुम्ही क्रिकेट कसोटी मॅच डावानं जिंकता तेव्हा किती विकेट गेल्या हे महत्त्वाचे नसते, असे महत्त्वपूर्ण विधान चिफ ऑफ डिफेन्स स्टाफ (सीडीएस) जनरल अनिल चौहान यांनी आज केले.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संरक्षण आणि सामरिक शास्त्र्ा या विभागातर्फे ‘फ्युचर वॉर्स अॅण्ड वॉरफेअर’ या विषयावर सीडीएस जनरल अनिल चौहान यांचे व्याख्यान झाले. याप्रसंगी कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, प्र. कुलगुरू डॉ. पराग काळकर, संरक्षण आणि सामरिक शास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. विजय खरे, वित्त व लेखा अधिकारी डॉ. चारूशीला गायके आदी उपस्थित होते.
‘ऑपरेशन सिंदूर’वेळी हिंदुस्थानचे किती नुकसान झाले, यासंदर्भात भाष्य करताना सीडीएस अनिल चौहान यांनी क्रिकेट कसोटी मॅचचे आणि फुटबॉलचे उदाहरण दिले. जेव्हा तुम्ही कसोटी क्रिकेट मॅच खेळत असता आणि डावाने जिंकता तेव्हा किती विकेट गेल्या, किती बॉल आणि किती फलंदाज बाद झाले हे महत्त्वाचे नसते. फुटबॉल सामन्यात एका संघाने तीन विरुद्ध दोन गोलने विजय मिळविला तर त्या संघाचा विजय महत्वाचा असतो, असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले.
पाकिस्तानला 8 तासांत गुडघे टेकवायला लावले
पाकिस्तानने ज्या लष्करी कारवाईसाठी 48 तास सांगितले होते ती मोहीम त्यांनी अवघ्या आठ तासांतच आटोपती घेतली. पाकिस्तानने युद्ध विरामाची भाषा केली. पाकिस्तानने हिंदुस्थानच्या डीजीएमओशी पह्न करून चर्चा केली. अवघ्या आठ तासांत पाकिस्तानला गुडघे टेकवायला लावले, अशी माहिती सीडीएस चौहान यांनी दिली.