सोयाबीन, कापसाचे भाव पाडण्यासाठी केंद्र सरकारने फतवे काढले – अंबादास दानवे

सोयाबीन आणि कापसाचे भाव पाडण्यासाठी केंद्र सरकारने फतवे काढले असल्याचा गंभीर आरोप शिवसेना नेते तथा विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला. वैजापूर तालुक्यातील मनूर व परसोडा येथील गावकऱ्यांशी आज ९ जून रोजी दानवे यांनी शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) वतीने सुरू असलेल्या ‘क्या हुआ तेरा वादा?’ जनआंदोलनअंतर्गत संवाद चालू असताना हा आरोप केला.

सोयाबीन आणि कापसाचे भाव पाडण्यासाठी परदेशातून हे पीक आयात करण्याचे फतवे काढले जात आहेत. शेतकरी सन्मान योजनेची रक्कम १२ हजारांवरून १५ हजार रुपये करण्याचे आश्वासन केवळ ‘बाजार गप्पा’ ठरले आहे. शेतमाल खराब न होण्यासाठी शीतगृहे देण्याचे बोलले, पण आज पावसाने खराब झालेल्या पिकांचे नुकसानही सरकारला उघड्या डोळ्याने दिसेनासे झाल्याची भूमिका दानवे यांनी शेतकऱ्यांसमोर मांडली.

बहिणींचे लाड’ हा केवळ फार्स ठरला आहे. लाडक्या बहिणींना वाढीव रक्कम सोडाच, पण आहे ती रक्कमही वेळेत देण्यास सरकार तयार नाही. आठ लाख महिलांच्या लाभावर फुली मारून सरकारने विश्वासघात केला आहे. उज्ज्वला गॅस योजना कोणत्या अडगळीत पडली आहे, हे सरकारलाही माहिती नाही. ‘दीड हजार देतो ना.. मग काही मागू नका..’ अशा अविर्भावात मंत्री वागत असल्याची टीका अंबादास दानवे यांनी केली.

यावेळी अनिल चोरडिया, तालुकाप्रमुख सचिन वाणी, विधानसभा संघटक मनाजी मिसाळ, शहरप्रमुख प्रकाश चव्हाण, तालुका संघटक मनोज गायके, जिल्हा युवा अधिकारी विठ्ठल डमाळे, अनिल नाव्हले, अक्षय साठे, अरुण शेलार, रमेश सावंत, राजू साळुंखे, बाळू बडक, नंदकिशोर जाधव, रमेश सावंत, दादासाहेब आव्हाळे, भगवान इंगळे, संतोष साळुंखे, कल्याण बोडखे, भानुदास पिंपळे, अरुण पवार, गायके उपस्थित होते.