चंद्रपूर मनपाच्या मलनिस्सारण संयंत्रात क्लोरीन गॅस गळती, 30 घरातील नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविले

चंद्रपूर शहरातील रहमतनगर भागात इरई नदीच्या पात्रात असलेल्या महानगरपालिकेच्या सिव्हरेज ट्रीटमेंट प्लांट मधून क्लोरीन गॅस गळतीने खळबळ उडाली आहे. प्लांटच्या जवळपास असलेल्या लोकांना डोळे आणि घशात जळजळ जाणवत आहे. यासह डोकेदुखी आणि उलटीचा त्रास होत असल्याचे दिसून आले आहे. 25 ते 30 घरातील लोकांना ताबडतोब सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले आहे.

गेल्या तीन ते चार दिवसांपासून क्लोरीन गॅस गळती सुरू असल्याचा स्थानिकांचा आरोप आहे. मात्र आज संध्याकाळी पाच वाजताच्या दरम्यान मोठ्या प्रमाणात क्लोरीन गॅसची गळती सुरू झाल्याचे स्थानिकांचे मत आहे. त्यामुळे परिसरात एकच घबराट पसरली असून लोकांनी सुरक्षित स्थळी धाव घेतली आहे. घटनेची माहिती कळताच जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन, महानगरपालिका आणि आपत्ती व्यवस्थापन पथकाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून क्लोरीन गॅस ची गळती थांबवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. नागरिकांनी मनपा विरोधात संताप व्यक्त केला आहे.