
काँग्रेस पक्षाला कोणतेही धोरण नाही. त्यामुळे काँग्रेसला लोक सोडून चालली आहेत. काँग्रेस फोडा अन् काँग्रेसला रिकामी करा, असा कानमंत्र देत काँग्रेसमधून कोणी आलं तरी तुमचा विचार अगोदर करणार असल्याचे आश्वासन भाजप प्रदेशाध्यक्ष आणि महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाजपच्या पदाधिकाऱ्यांना दिले. बावनकुळे म्हणाले, पक्ष संघटना वाढवण्यासाठी सर्वच पक्ष पक्षप्रवेश करून घेत असतात. विरोधकांमध्ये स्वतःची पार्टी वाढवण्याची क्षमता आता राहिली नाही. काँग्रेसला लोकं सोडून चालली आहेत. माजी आमदार संग्राम थोपटे यांनी काँग्रेसला सगळं दिले तरीदेखील त्यांना पक्ष सोडावा लागला. त्यांना त्यांच्या पक्षाकडून, काँग्रेस नेते, खासदार राहुल गांधी यांच्याकडून अपेक्षा नाहीत, असेही ते म्हणाले.