
कल्याण डोंबिवलीतील 65 बेकायदा इमारतींमध्ये राहणाऱ्या साडेसहा हजार कुटुंबांना ऐन पावसाळ्यात घरे रिकामी करण्याच्या नोटिसा पालिका प्रशासनाने बजावल्या आहेत. न्यायालयाच्या आदेशानुसार या इमारती तोडण्यात येणार असल्याने येथे राहणाऱ्या नागरिकांचे धाबे दणाणले आहेत. येथील रहिवाशांना बेघर केले जाणार नाही, काहीतरी मार्ग काढू असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. तरीही महापालिकेने कारवाईचा बडगा उगारला असून रहिवाशांवर बेघर होण्याची वेळ आली आहे. मुख्यमंत्री साहेब, तुम्ही दिलेला शब्द पाळा नाहीतर आम्हाला आत्महत्या करावी लागेल, असा टाहो येथील नागरिकांनी फोडला आहे.
न्यायालयाने सर्व बेकायदा इमारती त्वरित जमीनदोस्त करण्याचे आदेश केडीएमसीला दिले. एकीकडे मुख्यमंत्र्यांनी दिलेले आश्वासन आणि दुसरीकडे पालिकेने सुरू केलेली कारवाई याच्या कचाट्यात नागरिक सापडले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर आम्हाला काहीसा दिलासा मिळाला होता. पण आता पालिकेच्या हालचाली लक्षात घेता आम्हाला नाईलाजाने कुटुंबासह आत्महत्याच करावी लागेल, अशा शब्दांत रहिवाशांनी आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या आहेत.
क्या हुआ तेरा वादा..
महापालिकेने पाठवलेल्या नोटिसांमुळे आमची झोप उडाली आहे. या प्रश्नात कोणीही राजकारण करू नये. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आम्हाला दिलासा देण्याचे आश्वासन दिले होते. पण कृती मात्र त्याच्या उलट सुरू झाली आहे, क्या हुआ तेरा वादा?
– प्रणव पाटील (रहिवासी)
महाराष्ट्र सोडण्याची वेळ
मुख्यमंत्र्यांनी स्पष्टपणे सांगूनही कारवाईच्या नोटिसा पालिकेने कशा काय पाठवल्या, भरपावसात आम्ही राहायचे तरी कुठे, आधीच येथील घरांचे लोन सुरू आहे. त्यामुळे दुसरीकडे घर घेता येणार नाही. नाईलाजाने महाराष्ट्र सोडून दुसरीकडे जाण्याची वेळ आमच्यावर ओढवली आहे.
.. तर न्यायालयात जाऊ
कल्याण, डोंबिवलीतील रहिवाशांनी आज शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे कल्याण जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे यांची भेट घेतली. तसेच त्यांच्यासमोर आपले म्हणणे मांडले. यावेळी बोलताना म्हात्रे यांनी सांगितले की, महापालिकेने सर्व नोटिसा त्वरित मागे घ्याव्यात. येथील रहिवाशांच्या पाठीशी शिवसेना ठामपणे उभी राहणार असून प्रशासनाने नोटिसा मागे घेतल्या नाहीत तर न्यायालयात दाद मागू, असा निर्वाणीचा इशाराही त्यांनी दिला.
-रोहन गमरे (रहिवासी)