दुर्दैवी… विषण्ण करणारी दुर्घटना; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून तीव्र दु:ख व्यक्त

हिंदुस्थानचे संरक्षण दल प्रमुख जनरल बिपीन रावत यांच्यासह लष्करी अधिकाऱयांच्या मृत्यूबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे. ही दुर्घटना अत्यंत विषण्ण करणारी व दुर्दैवी आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी भावना व्यक्त केल्या. दुर्घटनेतील मृतांना श्रद्धांजली अर्पण करून त्यांच्या कुटुंबियांप्रतीही मुख्यमंत्र्यांनी सहवेदना प्रकट केली आहे.

 देशाचे संरक्षण दल प्रमुख जनरल बिपीन रावत आज आपल्यात नाहीत हे मनाला पटतच नाही. या अतिशय दुर्दैवी दुर्घटनेची माहिती कळल्यापासून मी खूप अस्वस्थ आहे. ते यातून वाचतील असे सारखे वाटत होते; पण शेवटी ती  दुर्दैवी बातमी आलीच. अनेक आघाडय़ांवर शौर्याने आणि धडाडीने नेतृत्व करणाऱया संरक्षण दलाच्या प्रमुखांचा त्यांच्या सहकाऱयांसमवेत असा मृत्यू होणं नियतीलाही मान्य असणार नाही. मी जनरल रावत आणि त्यांची पत्नी तसेच अन्य लष्करी अधिकाऱयांच्या मृत्यूमुळे खूप व्यथित झालो आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तीव्र शोक व्यक्त केला.

हिंदुस्थानचे संरक्षण दल हे सुसज्ज आणि बलशाली आहे. या तीनही दलांचे असे संयुक्त प्रमुखपद भूषवण्याचा पहिला गौरवही दिवंगत जनरल रावत यांना मिळाला. त्यांची कारकिर्दही त्यांच्या व्यक्तिमत्वाला आणि पदाला साजेशीच अशी होती. संरक्षण दलाला तडफदार आणि सर्व आघाडय़ांवर ठसा उमटविलेल्या अनुभवी असे नेतृत्व मिळाल्याने आपल्या तीनही दलांचे मनोबल उंचावले होते,  त्याचे प्रत्यंतरही अलिकडच्या तीनही दलांच्या कामगिरीतून दिसत होते असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.

या दुर्घटनेत दिवंगत रावत यांच्या पत्नीसह सुरक्षा क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी बजावणाऱया ब्रिगेडीयर आणि लेफ्टनंट जनरल दर्जाच्या अधिकाऱयांचाही अंत झाला आहे, हे अत्यंत दुःखद आहे. सुरक्षेतील कुशल, अनुभवी आणि धडाडीचे नेतृत्व गमावणे हे देशाच्या दृष्टीने मोठे नुकसान आहे. एपंदर दुर्घटनाच सबंध देशासह आपल्या सर्वांचे मन विषण्ण करणारी आहे. या सर्व शूरवीरांच्या आत्म्याला शांती लाभावी तसेच या सर्वांच्या कुटुंबीयांना हा दुर्देंवी आघात सहन करण्याची शक्ती मिळावी हीच ईश्वरचरणी प्रार्थना असे शोकसंदेशात नमूद केले आहे.