काँग्रेसने भाजपची बी टीम बनून… रोहित पवार यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी काँग्रेस पक्षावर गंभीर आरोप करताना म्हटले आहे की, काँग्रेसने भाजपची ‘बी टीम’ बनून काम केले आहे. नगर परिषदा आणि नगर पंचायत निवडणूक निकालांवर भाष्य करताना ते असं म्हणाले आहेत.

X वर एक पोस्ट करत रोहित पवार म्हणाले की, “जनतेने दोनदा मतांचं दान भरभरुन पदरात टाकलं, त्यांच्या मी कायम ऋणात राहिल, पण कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले आणि उमेदवारांनीही पूर्ण ताकदीने निवडणूक लढवली तरी आज लागलेला हा निकाल अत्यंत निराशाजनक आणि काम करणाऱ्याला नाऊमेद करणारा आहे. जनतेवर आक्षेप नाही पण सगळीकडे पैसाच चालत असेल तर बचत गट चालक, शेतकरी, दुकानदार आणि इतर अशा राजकीय दृष्टीकोनातून दुर्लक्षित आणि सामान्य कुटुंबातील उमेदवारांना आम्ही सत्तेच्या प्रवाहात आणण्याचा प्रयत्न करत होतो, त्यांना न्याय कधी मिळणार, हा प्रश्नच आहे.”

रोहित पवार म्हणाले, “आज तत्व आणि विकासावर चालणारं स्वच्छ राजकारण कमी आणि पैशांनी गढूळ झालेलंच अधिक दिसतं. म्हणूनच आमच्या विरोधात निवडून आलेल्या काही लोकांचे कारनामे आणि धंदे बघितले तर चारचौघात त्या धंद्यांचं नाव घेण्याचीही लाज वाटते. मग अशा परिस्थितीत डोक्यात विचारांचं काहूर उठल्याशिवाय राहत नाही.”

काँग्रेसवर टीका करत ते म्हणालेकी, “काही अपक्षांनी तसंच धर्मनिरपेक्ष आणि समतेचा जप करणाऱ्या काँग्रेसने भाजपाच्या उमेदवाराला स्वतःच्या तिकिटावर उभं करुन भाजपाची बी-टीम म्हणून काम करत जातीयवादी पक्षाच्या विजयाला हातभार लावला आणि लोकंही त्यांच्या या तिरक्या चालीला बळी पडले. त्यामुळं यापुढं काँग्रेसच्या जिल्ह्यातल्या नेत्यांवरही कसा विश्वास ठेवायचा, हाही प्रश्नच आहे.”