महायुतीतील रुसवा, दुरावा उघड; या आहेत पाच महत्त्वाच्या घटना

विधानसभा निवडणुकीत महाघोटाळा करत सत्तेत आलेल्या महायुतीत काहीही आलबेल नसल्याचे दिसत आहे. मुख्यमंत्रीपद मिळाले नसल्याने मिंधेनी त्यांची नाराजी अनेकदा व्यक्त केली आहे. अनेकदा ते रुसून गावालाही निघून गेले आहेत. त्यामुळे महायुतीतील भाजप, मिंधे सेना आणि अजित पवार गट यांच्यातील मतभेद आणि मनभेदही वाढत असून महायुतीतील अंतर्गत कोल्ड वॉर आता संघर्षाचे रुप घेण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे.

मिंधेंचे नाराजीनाट्य आणि रुसवा
सत्तेत आल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रीपद मिळाले. त्यामुळे मिंधे कमालीचे नाराज झाले. नाराजीचे आसू लपवण्यासाठी त्यांनी गावातील शेतीचा आसरा घेतला. मात्र, त्यांची नाराजी लपून राहिली नाही. त्यानंतर फडणवीस यांनी मिंधेंचे महत्त्व कमी करण्यासाठी शह-कटशहाचे राजकारण सुरू केले. त्यांनी मुद्दाम अजित पवार आणि त्यांच्या गटाचे महत्त्व वाढवण्यास सुरूवात केली. त्यातच मिंधे गटातील काही आमदारांची सुरक्षा कमी करण्यात आल्याने या कोल्ड वॉरला आता संघर्षाचे रुप आले आहे.

मिंधे गटाच्या नेत्यांच्या सुरक्षेत कपात

मिंधे गटातील अनेक प्रमुख आमदारांची Y-सुरक्षा काढून घेण्याचा किंवा कमी करण्याचा निर्णय महायुतीतील संघर्ष वाढवण्याची शक्यता आहे. सरकार स्थापनेला जेमतेम तीन महिने उलटत नाही तेच आता महायुतीतील अंतर्गत संघर्ष चव्हाट्यावर येत आहेत. आता या संघर्षात काही आमदारांची सुरक्षाव्यवस्थएत कपात करण्यात आल्याची भर पडली आहे. अलिकडेच, स्पेशल प्रोटेक्शन युनिट (एसपीयू) ने प्रमुख राजकीय नेते, मंत्री आणि आमदारांच्या सुरक्षेचा त्यांच्या धोक्याच्या आकलनाच्या आधारे आढावा घेतला. काही नेत्यांची, विशेषतः मिंधे गटातील नेत्यांची सुरक्षा कमी करण्यात आली आहे. भाजपचे देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यात कोल़्ड वॉर सुरू असतानाच त्यात या घटनेची भर पडली आहे.

2022 मध्ये मिंधे गटातील काही आमदारांना धोका असल्याने त्यांना वाढीव सुरक्षा देण्यात आली होती. तर त्यांच्याच गटातील 11 खासदारांना ‘Y’ सुरक्षा कवच देण्यात आले होते. आता सुरक्षेत कपात करण्यात आल्याने मिंधे गटातील नाराजी वाढली आहे.

पालकमंत्रीपदावरुन संघर्ष वाढला
सरकारमध्ये मंत्रीपदावरूनही चढाओढ सुरू होती. अनेकांना मंत्रीपद मिळाले नसल्याने त्यांच्यातही नाराजी आहे. त्याचप्रमाणे दोन जिल्ह्यात पालकमंत्र्यांच्या नियुक्ती रखडल्यानेही नाराजी वाढत आहे. त्यामुळे महायुतीत संघर्ष वाढत आहे. फडणवीस यांनी रायगड आणि नाशिक जिल्ह्यांचे पालकमंत्रीपद मिंधे गटाच्या नेत्यांना देण्यास नकार दिल्यानंतर तणावात वाढ झाली आहे. पालकमंत्रीपदावरून अजित पवार गट आणि मिंधे गटातील संघर्षही वाढला आहे.

फडणवीसांच्या बैठकीला मिंध्यांची दांडी
फडणवीस यांनी अलीकडेच आयोजित केलेल्या कुंभमेळ्यावरील महत्त्वपूर्ण आढावा बैठकीला शिंदे अनुपस्थित असल्याने फडणवीस आणि शिंदे यांच्यातील मतभेद आणि मनभेद उघड झाले. तसेच मिंधे यांनी या आठवड्यात स्वतःची समांतर बैठक आयोजित केली. हे फडणवीसांच्या अधिकाराला थेट आव्हान म्हणून पाहिले जात आहे. शरद पवार यांनी नवी दिल्लीत एकनाथ शिंदे यांचा सत्कार केला. त्यामुळेही संघर्षात वाढ झाली आहे.

मिंध्यांचे महत्त्व कमी करण्यासाठी शह-काटशह
देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली होती. त्यामुळे भाजप आणि मनसे यांच्यात युतीची चर्चा सुरू झाली होती. त्यामुळे मिंधे यांचे महत्त्व कमी करण्यासाठी भाजपकडून कुरघोडी करण्यात येत आहेत. त्यामुळे महायुतीत आलबेल नसल्याचे दिसून येत असून कोल्ड वॉरने आता संघर्षाचे रुप घेतल्याचे दिसत आहे. आता स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीआधी महायुतीतील संघर्ष अधिक तीव्र होणार असल्याची शक्यता राजकीय तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.