
लांब पल्ल्याच्या एक्स्प्रेस गाडय़ांमधील गर्दी नियंत्रणात ठेवण्यासाठी किंवा कमी करण्यासाठी रेल्वे नवीन फॉर्म्युला अंमलात आणण्याच्या तयारीत आहेत. म्हणजेच रेल्वेची जितकी क्षमता असेल त्याच हिशोबाने प्रवाशांना तिकीटे मिळू शकणार आहेत. ट्रेनमध्ये जितक्या जागा असणार आहेत त्याहून काही टक्केच अधिक तिकीटे देण्यात येणार आहेत. ही व्यवस्था जनरल आणि आरक्षित दोन्ही प्रकारच्या श्रेणीसाठी लागू असणार आहे. तिकीट विक्रीवर नियंत्रण आल्यास नवी दिल्ली रेल्वे स्थानकातील चेंगराचेंगरीसारख्या घटनाही टाळता येणार आहेत.
जनरल डब्यांसाठी निश्चित जागांपेक्षा दीड पट अधिक तिकीटे विकण्यात येतील. म्हणजेच कुठल्याही बोगीत मर्यादीत प्रवासीच प्रवास करू शकणार आहेत. तिकीटांची विक्री ट्रेनच्या हिशोबानेच करण्यात येईल. म्हणजेच ज्या ट्रेनमधून प्रवास करायचा आहे त्या ट्रेनचा क्रमांक जनरल तिकीटावर देण्यात येईल. सध्या या तिकीटांवर ट्रेनचा क्रमांक नसतो.
पुढील 4 ते 5 महिन्यात नवीन व्यवस्था
रेल्वे बोर्डाच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार तिकीट विक्री नियंत्रित करण्याचा अधिकार स्टेशन व्यवस्थापकाला तिकीटाच्या विक्रीवर नियंत्रण ठेवण्याचा अधिकार देण्याची तयारी सुरू आहे. स्टेशन व्यवस्थापक एकूण गाडय़ांची संख्या आणि त्यांच्या प्रवासी क्षमतेनुसार तिकीट विक्री थांबवू शकेल. प्रवासाच्या 24 तास आधी तिकीट खरेदी करून प्रवासी कोणत्याही ट्रेनने त्यांच्या गंतव्य स्थानावर जाऊ शकेल. अशी आणखी एक सुविधा जनरल तिकीटांमध्ये जोडण्यात येणार आहे.
शौचालयातून होणारा प्रवास टळणार
सध्या अमर्यादित तिकीटांची विक्री होते. त्यामुळे प्रत्येक ट्रेमध्ये सामान्य बोगीच्या बसण्याच्या क्षमतेपेक्षा तब्बल 3 ते 4 पट अधिक प्रवासी प्रवास करतात. त्यामुळे स्थानके आणि प्लॅटफॉर्मवर नेहमीच गर्दी असते. सणासुदीच्या काळात तर अनेक प्रवासी शौचालयात उभे राहून प्रवास करतात. सध्या ऑनलाइन आणि काऊंटरवरून किती तिकीटांची विक्री झाली याची प्रत्यक्ष माहिती मिळत नाही. मात्र, नवीन प्रणाली अशी सुविधा उपलब्ध असणार आहे.