
गेली पन्नासहून अधिक वर्षे आपल्या लेखणी व वाणीने समाजप्रबोधनाचे कार्य करणारे ज्येष्ठ विचारवंत, साहित्यिक आणि व्याख्याते दाजीशास्त्री पणशीकर आज पंचत्वात विलीन झाले. जवाहर बाग वैकुंठभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या निधनामुळे महाराष्ट्रातील साहित्य, संगीत, कला, लेखन व नाट्यक्षेत्राचा अर्ध शतकाचा चालता बोलता इतिहास हरपला असल्याची भावना व्यक्त होत आहे. विविध क्षेत्रांतील मान्यवरांच्या उपस्थितीत दाजीशास्त्रीना अखेरचा निरोप देण्यात आला.
रामायण व महाभारत हे दोन ग्रंथ तरुण पिढीसमोर आपल्या वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीने मांडणारे दाजीशास्त्री पणशीकर यांचे वयाच्या 92 व्या वर्षी शुक्रवारी ब्रह्मांड येथील निवासस्थानी निधन झाले. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच पुणे, मुंबई, गोवा अशा विविध भागांतून मान्यवरांनी त्यांच्या पार्थिवाचे दर्शन घेतले तसेच पणशीकर कुटुंबाचे सांत्वनही केले. आज सकाळी ब्रह्मांड येथील निवासस्थानापासून त्यांची अंत्ययात्रा निघाली. जवाहर बाग वैकुंठभूमीत मुलगा विक्रम पणशीकर यांनी दाजींच्या पार्थिवाला मंत्राग्नी दिला.
अंत्यसंस्काराच्या वेळी गायक रघुनंदन पणशीकर, मुकुंद मराठे, चित्रकार विजयराज बोधनकर, ज्येष्ठ कवी अरुण म्हात्रे, श्री कौपिनेश्वर सांस्कृतिक न्यासाचे संजीव ब्रह्मे, प्रदीप मुणगेकर, निशिकांत महांकाळ, ठाणे मराठी ग्रंथ संग्रहालयाचे विश्वस्त मकरंद जोशी, निवेदक नरेंद्र बेडेकर, ब्रह्मांड कट्ट्याचे संस्थापक राजेश जाधव यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.