दिल्ली डायरी – मायावतींची घालमेल का सुरू आहे?

>> नीलेश कुलकर्णी

एकेकाळच्या आक्रमक नेत्या बहेनजी मायावती यांच्या मनाची सध्या घालमेल का सुरू आहे? काही महिन्यांपूर्वी मायावतींनी आपले भाचे आकाश आनंद यांना बसपामधील आपला उत्तराधिकारी जाहीर केले होते. काही दिवसांनीच त्यांनी आकाश यांची हकालपट्टी करत दोन वेगळे राष्ट्रीय संयोजक नेमले. आता मायावतींनी पुन्हा आकाश आनंद यांनाच बसपाचे मुख्य संयोजक नेमून अनौपचारिकपणे आपला उत्तराधिकारी नेमले आहे. अवघ्या चार महिन्यांच्या काळात मायावतींच्या मनाची अशी चलबिचल का झाली?

उत्तर प्रदेशात दीडेक वर्षाने विधानसभा निवडणुका होतील. या निवडणुका बसपा जिंकण्यासाठी खचितच लढणार नाही. तितकी राजकीय ताकद आता बसपाची राहिलेली नाही. 2014 नंतर मायावतींनी दिल्लीतील सत्ताधाऱ्यांना ईडी, सीबीआयच्या भीतीपोटी शरण जाण्याची भूमिका घेतल्याने मायावतींचे बलदंड असे केडर विखुरले गेले. मायावतींपासून ब्राह्मण, दलित भाजपकडे गेले. त्यामुळे भाजपचे आयतेच फावले. उत्तर प्रदेशच्या आगामी विधानसभा निवडणुकीत समाजवादी पार्टी आगेकूच करताना दिसत आहे. त्या वेळी मायावती काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष असेल. याचे कारण म्हणजे मायावती उत्तर प्रदेशातून एकही लोकसभेची जागा जिंकू शकल्या नसल्या तरी त्यांच्या पक्षाला मिळालेल्या मतांची टक्केवारी कायम आहे. मायावतींनी अखिलेशबाबूंसोबत आघाडी केली तर भाजपचा सुफडा साफ होणार आहे. आकाश आनंद यांना पुढे करून मायावती कोणती चाल खेळतात ते पाहावे लागेल.

राजकीय पटलावरून गेल्या काही वर्षांपासून अदृश्य असलेल्या मायावती मध्यंतरी निवडणूक आयोगाच्या कार्यालयात दिसल्या. त्यांच्यासोबतच राजकीय विजनवासात गेलेले मायावतींचे चाणक्य आणि उत्तर प्रदेशच्या सोशल इंजिनीअरिंगचे प्रणेते सतीशचंद्र मिश्रादेखील दिसले. त्यामुळे मायावती पुन्हा आपल्या केडरमध्ये जान फुंकणार की दिल्लीला शरण जाणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. मायावतींपासून सतीशचंद्र मिश्रांना दूर केल्यानंतर बसपाची घसरणच झाली. मायावतींनी यापूर्वी राजा राम, रामजी गौतम व रणधीर बेनीवाल या अगदीच सामान्य क्षमता असलेल्या नेत्यांची पक्षाच्या संयोजकपदी नेमणूक करून त्यांना जबाबदारीचे वाटप केले होते. मात्र बसपामध्ये एक प्रकारची मरगळ आलेली आहे. मायवती सक्रिय नाहीत. आतून भाजपला मदत करतात. त्यामुळे कार्यकर्ते निराश आहेत. अशा स्थितीत मायावतींनी अचानक आकाश आनंद या आपल्या भाच्याला पुन्हा पक्षाची धुरा सोपवली आहे. आकाश यांच्या पत्नीमुळे मायावती व आकाश यांच्यात मतभेद निर्माण झाले होते. ‘ससुराल का पार्टी कामकाज में हस्तक्षेप नही चलेगा,’ असे आकाशकडून वदवून घेतल्यानंतर मायावतींनी आकाशच्या नियुक्तीची ‘आकाशवाणी’ केली. उत्तर प्रदेशच्या निवडणुकीपूर्वी केंद्रातील सरकार अस्थिर झाले तर मायावती समाजवादी पक्षासोबत आघाडी करतील हे नक्की. मुलायमसिंग व मायावती यांच्यात कधीच सौहार्द नव्हते. मात्र समाजवादी पक्षातील नव्या पिढीने मायावतींचा कायम सन्मान केला आहे. त्यामुळे मायावतीदेखील अखिलेश यांना भतिजा वगैरे मानतात. उत्तर प्रदेशमध्ये भाजपला हरविण्यासाठी धर्मनिरपेक्ष मतांमध्ये फाटाफूट टाळणे गरजेचे आहे. आकाश आनंदकडे जबाबदारी सोपवून मायावतींनी त्यादृष्टीने पाऊल टाकल्याचे मानले जात आहे. मायावतींचा हत्ती एक चाल खेळत पुढे गेला तर मुख्यमंत्री योगींना गोरखनाथ पीठात पुन्हा जावे लागेल. त्यामुळे मायावतींच्या घालमेलीचे अनेक अन्वयार्थ लावले जात आहेत.

थरुरांचा मार्ग वेगळा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्यांच्यावर ‘पचास करोड की गर्लफ्रेंड’ अशी व्यक्तिगत पातळीवर टीका केली होती ते थरुर सध्या मोदींचे एकदम लाडके बनले आहेत. गमतीचा भाग म्हणजे, जगभरात सध्या आपल्या परराष्ट्र धोरणाबद्दल टोकाची टीका होत असताना युनोमध्ये काम केलेले थरुर जयशंकर यांच्या फसफसलेल्या परराष्ट्र धोरणाचे काwतुक करत आहेत. विदेशी गेलेल्या शिष्टमंडळाचे थरुर हे प्रमुख आकर्षणबिंदू आहेत. परदेशातून परत आल्यानंतर थरुर केंद्रात मंत्री होतील व त्यांना मनुष्यबळ विकासासारखे महत्त्वाचे खाते दिले जाईल, अशी जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात आहे. आपल्याला केरळमध्ये काँग्रेसकडून मुख्यमंत्रीपदाचा चेहरा घोषित करावे, यासाठी थरूर यांनी हायकमांडकडे हट्ट धरला होता. मात्र राहुल गांधी यांनी केरळमध्ये सत्ता आलीच तर वेणुगोपाल किंवा रमेश चेन्निथला यांच्यापैकी एक मुख्यमंत्री होईल. त्यांचे पक्षासाठी तेवढे योगदान आहे, असे सांगत थरुर यांची पाठवणी केली होती. तेव्हापासून थरुर मोदींच्या व मोदी थरुर यांच्या प्रेमात पडले आहेत. केरळमध्ये भाजपचे सरकार येणार नाही हे सूर्यप्रकाशाइतके स्वच्छ आहे. केरळमध्ये डाव्यांचे सरकार पुन्हा आले तरी ते भाजपला चालणारे आहे. फक्त काँगेस नको, अशी मोदी-शहा यांची रणनीती आहे. त्याकामी थरुर यांची भाजपला थोडीफार मदत होईल. त्याची बक्षिसी म्हणून वयाच्या सत्तराव्या वर्षी थरुर यांना मंत्रीपदाची झूल पांघरली जाईल, असे बोलले जात आहे. नेमके काय होते ते थरुर परत आल्यावरच कळेल.

भाजप नेत्यांची बेताल बडबड

ऑपरेशन सिंदूर जणू काही भाजपच्या नेत्यांनी पाकिस्तानमध्ये घुसून केल्यासारखे त्याचे ‘मार्पेटिंग’ सुरू आहे. भारतीय लष्कराचे श्रेय स्वतःच्या नावाने करण्याचा प्रताप सुरू असताना, पहलगाम व सिंदूर प्रकरणी बेताल बोलण्याची मालिका भाजप नेत्यांनी सुरूच ठेवली आहे. मध्य प्रदेशमधले भाजपचे मंत्री विजय शाह यांनी ज्यांच्या शौर्यावर देशाला गर्व आहे अशा कर्नल सोफिया कुरेशी या पाकिस्तान्यांच्या भगिनी असल्याची अश्लाघ्य टिप्पणी केली होती. सुप्रीम कोर्टाने फटकारूनही चाल, चरित्र, चेहरा याची द्वाही देणाऱ्या भाजपने त्यांना मंत्रिमंडळातून बरखास्त केलेले नाही. शाह यांची बकबक थांबत नाही तोच मध्य प्रदेशचेच उपमुख्यमंत्री जगदीश देवडा यांनी भारतीय लष्कर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या चरणांवर नतमस्तक आहे, अशी लष्कराचा अपमान करणारी व मनोधैर्य खच्ची करणारी टिप्पणी केली. पाठोपाठ हरियाणातील राज्यसभा खासदार रामचंद्र जांगडा यांनी पहलगाममध्ये दहशतवाद्यांच्या गोळीला बळी पडलेल्या नागरिकांचा अपमान करत त्यांच्या पत्नींमध्ये वीरांगनेसारखा जोश नव्हता म्हणून 26 लोक नाहक बळी गेल्याचे निषेधार्ह वक्तव्य केले. त्यावर कडी म्हणजे या लोकांनी जर नरेंद्र मोदींना अभिप्रेत असलेले अग्निवीर स्वंय प्रशिक्षण घेतले असते तर त्यांचा जीव गेलाच नसता, असा शोधही लावला आहे आणि मोदीभक्तीचे ओंगळवाणे दर्शन घडविले आहे. ऑपरेशन सिंदूरनंतर भाजपचे नेते वाट्टेल ते बरळत आहेत. मात्र कोणालाही पक्षाच्या नेतृत्वाने साधे फटकारल्याचे दिसून आलेले नाही. त्यामुळे ऑपरेशन सिंदूरनंतर जनमानसांत काय प्रतिक्रिया आहे, हे अजमावण्यासाठीच हीं बेताल बडबड पक्ष नेतृत्वाच्या संमतीनेच सुरू आहे की काय, अशी शंका व्यक्त केली जात आहे.