
रॉयल चॅलेंजर्सं बंगळुरू संघाने 18 वर्षानंतर आयपीएलची ट्रॉफी जिंकली आणि आरसीबीच्या चाहत्यांनी एकच जल्लोष केला. मात्र हा जल्लोष जीवावर बेतला असून बंगळुरुतील एम. चिन्नास्वामी मैदानावर झालेल्या चेंगराचेंगरीत 11 जणांचा मृत्यू झाला. अनेक तरुण या चेंगराचेंगरीमध्ये जखमी झाले आहेत. या चेंगराचेंगरीमध्ये जीव गमावलेल्या एका मुलाच्या हतबल वडिलांची भावूक करणारी प्रतिक्रिया समोर आली आहे.
कृपया मला माझ्या मुलाचे शरीर परत द्या. त्याच्या शरिराचे शवविच्छेदन करू नका. एकूलता एक मुलगा तर गेला आता त्याच्या शरीराचे तुकडे तरी करू नका, अशी विनंती बंगळुरुतील चेंगराचेंगरीत मुलाला गमावलेल्या वडिलांनी अधिकाऱ्यांकडे केली.
मला एकच मुलगा होता, आता तोही गेला. मला न सांगता तो येथे आला होता. आता मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री सांत्वन करायला येतील. पण माझा मुलगा परत येणार नाही. त्याच्या मृतदेहाचे तुकडे तुकडे करू नका, अशी आर्त विनंती मुलाच्या वडिलांनी केली. मात्र नियमानुसार चेंगराचेंगरीत जीव गमावलेल्या सर्व मृतांची शवविच्छेदन प्रक्रिया पूर्ण करून हे मृतदेह कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आले. ‘एनडीटीव्ही‘ने याबाबत वृत्त दिले आहे.
बंगळुरुतील चेंगराचेंगरीत जीव गमावलेल्या मुलाची आई उपमुख्यमंत्र्यांसमोर झाली भावूक #BengaluruStampede pic.twitter.com/xn7P3Frn3U
— Saamana Online (@SaamanaOnline) June 5, 2025
दरम्यान, मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी बंगळुरुतील चेंगराचेंगरीच्या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. तसेच पुढील 15 दिवसांमध्ये तपास अहवाल सादर करण्याचे निर्देश सिद्धरामय्या यांनी दिले. दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या घटनेवर शोक व्यक्त केला आहे.
नक्की काय घडले?
आयपीएल जिंकल्यानंतर विराट कोहली, कर्णधार रजत पाटीदारसह संपूर्ण संघ बुधवारी बंगळुरुत दाखल झाला. विमानतळावरच हजारो क्रिकेट रसिकांनी गर्दी केली होती. त्यानंतर ‘आरसीबी’च्या टीमचा कर्नाटक विधान भवनात मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. विधान भवन ते चिन्नास्वामी स्टेडियम विजयी संघाची ओपन व्हिक्टरी परेड निघणार होती. मात्र रस्त्यावर क्रिकेटप्रेमींची प्रचंड गर्दी उसळल्यामुळे पोलिसांनी परवानगी नाकारली. ऐनवेळी ही परेड रद्द केली आणि थेट स्टेडियमवर विजयी संघ पोहचला आणि सत्कार समारंभ झाला. पण त्याचवेळी गेट क्रमांक तीन जवळ भयंकर चेंगराचेंगरी झाली. पोलिसांनाही गर्दीवर नियंत्रण मिळवता आले नाही. या चेंगराचेंगरीत 11 जणांचा मृत्यू झाला. तर 33 वर जखमी आहेत.
बंगळुरूत विजयाचा जल्लोष क्रिकेटप्रेमींच्या जिवावर, चेंगराचेंगरीत 11 जणांचा मृत्यू; 33 जखमी