
शिवाजीनगर येथील घोले रस्त्यावरील महापालिकेच्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहाच्या पुनर्विकासासह वसतिगृहाचा विस्तार होणार आहे. पुनर्विकासानंतर येथे 700 विद्यार्थ्यांची निवासाची सोय होणार आहे. दहा मजली इमारतीच्या या कामाच्या आराखड्याला इस्टिमेट कमिटीने नुकतीच मान्यता दिली.
ग्रामीण भागातून उच्च शिक्षणासाठी शहरात येणाऱ्या अल्प उत्पन्न गटातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी पन्नास वर्षांपूर्वी घोले रस्त्यावर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहाची उभारणी केली होती. येथे 350 विद्यार्थ्यांच्या निवासाची सुविधा उपलब्ध आहे. ही इमारत जुनी आणि जीर्ण झाल्याने येथील जुन्या पध्दतीच्या बांधकाम रचनेमुळे समस्या निर्माण झाल्या होत्या. गेल्यवर्षी वसतिगृहात डेंग्यूची लागण झाल्याने विद्यार्थ्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखलकेले होते. उपचारादरम्यान एका विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला होता. या घटनेची दखल घेत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हॉस्टेलची पाहणी केली. औषध फवारणी आणि तातडीच्या दुरुस्त्यांची कामे देखील केली.
मात्र, इमारतीचे आयुर्मान, देखभाल-दुरुस्तीवरील खर्च आणि भविष्याची गरज लक्षात घेऊन या इमारतीच्या पुनर्विकासाचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार तयार केलेल्या या इमारतीच्या विकास आराखड्याला इस्टीमेट कमिटीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.
या असणार सुविधा
वसतिगृहाची जागा सुमारे एक लाख 70 हजार चौ. फूट असून यापैकी 43 हजार चौ. फूट बांधकाम आहे. नवीन रचनेनुसार येथे दोन लाख चौ. फुटांचे बांधकाम करण्यात येणार आहे. सध्या 350 बेड्सची क्षमता असून ती नियोजित वसतिगृहातील बेड्सची क्षमता 700 पर्यंत होणार आहे. तळमजल्यावर पाच मोटारी आणि 248 दुचाकींचे पार्किंग असेल. याच मजल्यावर मीटिंग एरिया, प्रशासन आणि सुरक्षा विभागाचे कार्यालय तसेच वेस्ट मॅनेजमेंटसाठी चार खोल्या आणि दोन स्वच्छतागृह असतील.
जुन्या इमारतीचे आयुर्मान, देखभाल-दुरुस्तीवरील खर्च आणि भविष्याची गरज लक्षात घेऊन पुनर्विकासाचा निर्णय घेण्यात आला. या विकास आराखड्याला इस्टिमेट कमिटीने मान्यता दिल्याने निविदा प्रक्रिया राबविण्यात येईल. या इमारतीसाठी शासनाच्या समाज कल्याण विभागाकडूनही आर्थिक मदत मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, असे मनपाचे भवन विभागाचे मुख्य अभियंता युवराज देशमुख यांनी सांगितले.