
महाराष्ट्राच्या दोन्ही संघांनी पहिल्या युवा (18 वर्षांखालील) मुले व मुलींच्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत विजयी सलामी दिली. मुलींच्या ‘इ’ गटात महाराष्ट्राने झारखंडवर 50-16 अशी सहज मात केली. मुलांच्या सामन्यात महाराष्ट्राने ‘इ’ गटात केरळचा 54-24 असा दारुण पराभव केला.
हरिद्वार (उत्तर प्रदेश) येथे ही स्पर्धा सुरू आहे. मुलींच्या गटात महाराष्ट्राने आक्रमक सुरुवात करीत पूर्वार्धात 35-10 अशी भक्कम आघाडी घेत आपला विजय निश्चित केला. उत्तरार्धात त्याच जोशात खेळ करीत गुणांचे अर्धशतक गाठले. बिदिशा सोनार, सेरेना म्हसकरचा चढायांचा झंझावात थोपविणे झारखंडला जमले नाही. प्रतीक्षा गुरवचा बचाव उत्कृष्ट होता. यांच्या खेळामुळे महाराष्ट्राला हा विजय सोपा गेला. या ‘इ’ गटात महाराष्ट्रसह झारखंड व छत्तीसगड हे संघ आहेत. या गटात जेतेपद मिळवायचे असेल तर महाराष्ट्राला छत्तीसगडला पराभूत करावे लागेल.
मुलांच्या सामन्यात महाराष्ट्राने ‘इ’ गटात केरळचा 54-24 असा दारुण पराभव केला. बचाव व आक्रमणावर समांतर भर देत मुलांनी विश्रांतीलाच 21-08 अशी आघाडी घेतली होती, नंतरदेखील आपल्या खेळात सातत्य राखत गुणांचे अर्धशतक पार करीत सामना एकतर्फी केला. स्वराज मुळे, अथर्व सोनवणे यांच्या तुफानी चढायांमुळे हा विजय सहज शक्य झाला.
nकेरळच्या संघाला उत्तरार्धात थोडा फार सूर सापडला, पण तोपर्यंत वेळ निघून गेली होती. या गटात महाराष्ट्रासह दिल्ली व केरळ हे अन्य संघ आहेत. या गटाच्या जेतेपदाकरिता महाराष्ट्राला दिल्लीचे आव्हान पेलावे लागेल.