
देशातील वेगवेगळ्या भागांत पावसाचे जोरदार आगमन झाले असून, पूर्वोत्तर राज्यांत पावसाने अक्षरशः कहर केला आहे. गेल्या तीन दिवसांत झालेल्या मुसळधार पावसामुळे मणिपूर, मिझोराम, आसाम, अरुणाचल प्रदेश, त्रिपुरात आतापर्यंत 25 लोकांचा मृत्यू झाला आहे. तसेच पाऊस, भूस्खलन आणि पूर याचा पाच जिल्ह्यांतील 12 हजारांहून अधिक कुटुंबांना फटका बसला आहे. पावसात घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. हवामान खात्याने सर्व राज्यांसाठी अलर्ट जारी केला आहे.
मिझोरामच्या लाँगतलाई शहरात मुसळधार पाऊस आणि भूस्खलनामुळे पाच घरे आणि हॉटेल कोसळले. यात अनेक नागरिक अडकले आहेत. लोकांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी एसआरडीएफ यांच्याकडून प्रयत्न केले जात आहेत. भूस्खलनामुळे राष्ट्रीय राजमार्ग 54 बंद करण्यात आला आहे. तसेच गेल्या 24 तासांत मिझोरम, त्रिपुरा आणि मेघालयात 8 जणांचा मृत्यू झाला आहे.
आसाममधील 17 जिल्ह्यात पूरस्थिती असून भूस्खलनाच्या घटनाही घडत आहेत. आसामध्ये 78 हजारांहून अधिक लोक पुरामुळे प्रभावित झाले असून जवळपास 1200 जणांनी 5 वेगवेगळ्या मदत शिबिरांमध्ये आश्रय घेतला आहे. आसामध्ये लखीमपूर जिल्ह्यात पुराचा कहर दिसून येत आहे. तसेच आसाममधील कामरूप मेट्रो जिल्ह्यात 5 लोकांचा मृत्यू झाला आहे. गेल्या 24 तासांत गुवाहाटी आणि आजूबाजूच्या परिसरात 90 ते 134 मिमी पाऊस झाला आहे. गुवाहाटीमध्ये भूस्खलनामुळे अनेक घरे कोसळली. यात एकाच कुटुंबातील तीन जणांचा मृत्यू झाला. तसेच गोलाघाट आणि लखीमपूरमध्ये एकाचा मृत्यू झाला.
चीनच्या सीमेला लागून असलेल्या अरुणाचल प्रदेशातील मुसळधार पाऊस आणि भूस्खलनामुळे नऊ लोकांचा मृत्यू झाला आहे. पुराच्या पाण्यात वाहन वाहून गेल्याने 7 जणांचा मृत्यू झाला, दोन वेगवेगळ्या घटनेत दोघांचा मृत्यू झाला. तर मणिपूरमध्येही तीन दिवसांपासून कोसळत असलेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. शहरातील अनेक भागांमध्ये पावसाचे पाणी साचले असून अधिकाऱ्यांनी पुराचा इशारा जारी करत नदीकिनाऱ्यावरील लोकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्याचे आवाहन केले आहे.
VIDEO | Manipur: Various parts of Imphal witness severe flooding followed by incessant rainfall.
(Full video available on PTI Videos – https://t.co/n147TvrpG7) pic.twitter.com/Kwiru3bGpW
— Press Trust of India (@PTI_News) May 31, 2025
दरम्यान, हवामान विभागाने येत्या काही दिवसांमध्ये पूर्वोत्तर राज्यांत पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज वर्तवला आहे. तसेच आसाममधील काही भागांसाठी रेड आणि ऑरेंज अलर्टही जारी करण्यात आले आहेत. पूरस्थितीमुळे एनडीआरएफ, एसडीआरएफ, पोलीस आणि अग्निशमन दल सतर्क असून रहिवाशांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात येत आहे. पावसामुळे शाळा, महाविद्यालयांनाही सुट्टी देण्यात आली आहे.
#WATCH | Mangan, Sikkim: Water level of the Teesta river increases following heavy rainfall in the region.
(Source: IPR, Mangan) pic.twitter.com/ahXPLSXkjJ
— ANI (@ANI) June 1, 2025