महाराष्ट्रासाठी शिंदे गट म्हणजे एमआयएम, गद्दारांना कोणतीही मदत होईल, अशी भूमिका घेणार नाही – संजय राऊत

महाराष्ट्रासाठी शिंदे गट म्हणजे एमआयएम, गद्दारांना कोणतीही मदत होईल, अशी भूमिका घेणार नाही, असं शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत म्हणाले आहेत. कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या स्थानिक नेत्यांनी शिंदे गटाला पाठिंबा जाहीर केला आहे. यावरच आपली प्रतिक्रिया देताना संजय राऊत असं म्हणाले आहेत.

माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधताना संजय राऊत म्हणाले की, “आमची भूमिका फार वेगळी आणि कडवट आहे. ज्यांनी महाराष्ट्राशी, हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, मराठी माणसांशी गद्दारी आणि बेईमानी केली, त्यांच्याबरोबर कोणत्याही प्रकारचं राजकीय किंवा अन्य संबंध ठेवायचे नाहीत. महाराष्ट्राच्या गद्दारांना मदत होईल, अशी भूमिका घ्यायची नाही. सत्ता येते आणि जाते. आम्ही सत्तेसाठी हपापलेले लोकं नाही. स्वतः राज ठाकरेही नाहीत. त्यामुळे आमच्या भूमिका स्पष्ट आहेत.”

संजय राऊत म्हणाले की,”कल्याण-डोंबिवलीचा विषय हा समोर आलेला असून तो अत्यंत चिंताजनक आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की, स्थानिक पातळीवरचा निर्णय आहे. असू शकेल. जर पक्षाच्या मूळ ध्येय धोरणांशी प्रतारणा करून कोणत्याही पक्षाचं, स्थानिक म्हणून घेणारं नेतृत्व विपरीत भूमिका घेत असेल, तर पक्षनेतृत्वाने त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे. पक्षातून निलंबित करण्याची कायदेशीर कारवाई केली पाहिजे. काँग्रेस पक्षाच्या १२ नगरसेवकांनी भाजपशी असंगत करताच त्यांच्या पक्षाने ताबडतोब पक्षाच्या ध्येय धोरणांशी प्रतारणा केल्याबद्दल त्यांना पक्षातून काढून टाकले. ही एक राजकीय व्यवस्था आहे. फक्त स्थानिक पाळतीवर हा निर्णय झाला, असं सांगून हा विषय संपत नाही.”

ते म्हणाले, “शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि मनसे हे एकत्र आहेत. एकत्र निवडणुका लढल्या. अशा वेळेला कोणी एखाद्या चिन्हावर निवडून येऊन बेडूक उड्या मारत असेल, तर त्या संदर्भात त्यांच्या पक्षाने आणि आणि नेतृत्वाने एक भूमिका घ्यावी. त्या पक्षनेतृत्वाने त्यांच्यावर कारवाई करून महाराष्ट्राला दाखवायला हवं की, या भूमिकेशी आम्ही सहमत नाही. कारण राजू पाटील बोलत असताना त्यांच्या बाजूला त्यांच्या पक्षाचे एक नेते उपस्थित होते. असं मला निदर्शनास आणलं गेलं. आता शिंदे गटाचे लोकं म्हणतात, मनसे म्हणजे एमआयएम आहे का? नाही. पण आमच्यासाठी आणि महाराष्ट्रासाठी शिंदे गट म्हणजे एमआयएम आहे. मराठी माणसातला एमआयएम, बेईमान, महाराष्ट्रद्रोही, त्यामुळे त्यांच्याबरोबर जाणारे सुद्धा त्याच विशेषनाला पात्र ठरतात. सत्ता मिळाली नाही, काही मिळालं नाही म्हणून, अशा प्रकारे बेईमानी करणाऱ्यांना महाराष्ट्र माफ करत नाही. तुमची काही व्यक्तीगत कारणे असू शकतात, ती तेवढ्यापुरतीच ठेवायला हवीत. काही लोकांच्या मागे ईडी आहे. तपास यंत्रणा काही लोकांच्या मागे लागल्या असतील. मात्र तुम्ही त्यासाठी कोणीही पक्ष वेठीस धरणं आणि महाराष्ट्राच्या गद्दारांशी हातमिळवणी करणं, हे पूर्णपणे चुकीचं आहे. माझ्यावर ईडीचं संकट आलं, मी पक्षास वेठीस नाही धरलं. मी त्या संकटाशी सामना केला. आजही माझी प्रकृती अत्यंत खराब आहे, मी आता ऑपरेशन थेटरमधून आलेलो आहे.”

संजय राऊत म्हणाले, “कल्याण-डोंबिवलीचा विषय उद्धव ठाकरे यांनी अत्यंत गांभीर्याने घेतला आहे. राज ठाकरे यांच्याशी माझी चर्चा झालेली आहे. काही मिळालं नाही, तर मी सोडून जातो, अशा मानसिकतेत काही लोकं असतात, असं त्यांचं म्हणणं आहे. एकंदरीतच राजकारणातील मानसिक स्थिरतेचा हा प्रश्न आहे, असं त्यांचं म्हणणं आहे. हे खरं आहे. अशा तऱ्हेने पक्षांतर करणारे हे राजकीय मनोरुग्ण आहेत. मला काहीतरी हवं आहे, तेही आताच. मग शहराचा, गावाचा, राज्याचा, देशाचा आणि जगाचा विकास यानावाखाली पक्षांतर वाढत जातं.”

संजय राऊत पुढे म्हणाले की, “या निर्णयामुळे राज ठाकरे व्यथित आहेत. हा निर्णय स्थानिक पातळीवर झाला असं म्हणतात. त्यामुळे ते व्यथित आहेत. त्यांचंही म्हणणं आहे की, प्रत्येकाला आपण काही देऊ शकत नाही. देण्याच्या स्थित नाहीत आणि मला आता पाहिजेच. नाही दिलं तर जातो, ही भूमिका मानसिक अस्थिरतेचं हे लक्षण आहे.”

मुंबईत ही असं होऊ शकतं का? असा प्रश्न माध्यम प्रतिनिधींनी त्यांना विचारलं असता संजय राऊत म्हणाले की, “मुंबईत हे असं होणार नाही. शेवटी महाराष्ट्राची सत्ता ही पूर्णपणे देवेंद्र फडणवीस यांच्या हातात आहे. कल्याण-डोंबिवलीचा निर्णय हा त्यांना पटला नाही तर, पाठिंबा देण्याचं हे प्रकरण जे घडलं आहे, त्यांच्यामागे फार मोठा ससेमिरा लागू शकतो.”