पंढरपुर विकास आराखडा अभ्यास समिती तयार करा; जिल्हाधिकार्‍यांच्या बैठकीत कॉरिडॉर संदर्भात बाधित परिसरातील मठ, मंदिरांच्या विश्वस्तांची मागणी

शासन, वारकरी संप्रदाय व पंढरपूर नागरिक यांचा सर्वांच्या संमतीने विकास आराखडा तयार करण्यासाठी वारकरी संप्रदायाचे प्रतिनिधी, पंढरपुर नागरिक प्रतिनिधी, लोकप्रतिनिधी व प्रशासकीय अधिकारी यांचा एक प्रतिनिधी अशी ’पंढरपुर विकास आराखडा अभ्यास समिती’ तयार करावी. या समितीच्या मार्गदर्शनाखाली पंढरपुर विकास आराखड्याची पुनर्मांडणी प्रयत्न झाला तर सर्वांना समाधान होईल. पंढरपुर विकास करणे शक्य होईल.

यासाठी सदर समितीचे तात्काळ गठण होणे आवश्यक आहे. या समितीच्या द्वाराच या प्रश्नावर तोडगा निघू शकतो, असे आम्हा कॉरिडॉर बाधितांना वाटते. यावर आपण सकारात्मक निर्णय घ्यावा, असे निवेदन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना वारकरी संप्रदायाचे प्रतिनिधी व तीर्थक्षेत्र बचाव समितीच्यावतीने देण्यात आले.

जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी पंढरपूर येथे कॉरिडॉर संदर्भात बाधित परिसरातील मठ, मंदिरांच्या विश्वस्तांशी मंगळवार दि. 12 रोजी चर्चा केली. यावेळी बाधितांकडून पंढरपुर विकास आराखडा अभ्यास समिती ’ तयार करावी. अशी मागणी करण्यात आली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वारकर्‍यांना सुखसुविधा देण्यासाठी पंढरपूर येथे कॉरिडॉर (विकास आराखडा) प्रस्तावित केला आहे. या प्रस्तावीत आराखड्यात अनेक त्रुटी असून सदरचा प्रस्ताव वारकरी संप्रदायातील मान्यवरांनी केलेल्या सुचना डावलून केला जात आहे. तसेच वारकर्‍यांचे प्रश्न वेगळे आणि उत्तरे वेगळी असा दिसून येत आहे. यामध्ये अनावश्यक भुसंपादन देखील दाखवण्यात आले आहे. यावरुन मोठा वादंग सुरु आहे.

वारकरी संप्रदायातील सर्वांनी मिळून एक चांगला भुवैकुंठ विकास आराखडा शासनास सादर केला होता, त्याचे काय झाले, याचे उत्तर शासनाकडून मिळाले नसल्याचे वारकरी प्रतिनिधींनी जिल्हाधिकारी यांना बैठकीत सांगीतले.

यावेळी राणा महाराज वासकर, कबीर महाराज, निलेश बडवे, गणेश लंके, दत्तात्रय कवठेकर, मदन महाराज हरिदास, गणेश बडवे महाराज, भागवत महाराज चवरे, सुधीर रानडे, कौस्तुभ गुंडेवार, महेश महाराज देहूकर आदी उपस्थित होते.