
प्रसिद्ध अभिनेता राजपाल यादव यांना अखेर जामिन मिळाला आहे. जुन्या चेक-बाउन्स प्रकरणात तिहार तुरुंगात सुमारे १० दिवस घालवल्यानंतर, दिल्ली उच्च न्यायालयाने अंतरिम जामीन मंजूर केल्यानंतर त्यांची सुटका करण्यात आली. तुरुंगातून बाहेर पडताना राजपाल यादव यांच्या चेहऱ्यावर नेहमीचा साधेपणा दिसून आला आणि त्यांनी प्रथम न्यायव्यवस्थेचे आभार मानले. गेल्या ३० वर्षांच्या त्यांच्या प्रवासाबद्दल माध्यमांशी बोलताना ते भावनिक झाले. राजपाल यांनी स्पष्ट केले की ते आजपर्यंतच्या प्रत्येक न्यायालयीन सुनावणीला उपस्थित राहिले आहेत आणि कायद्याचा पूर्णपणे आदर करतात.
राजपाल यादव म्हणाले, ” ज्या लोकांनी मला यापूर्वी मदत केली आहे त्यांनी पुन्हा एकदा त्याला चांगल्या भूमिका देऊन मदत करावी. पात्र माझ्या मर्जीचे पैसे तुम्ही तुमच्या मर्जीने द्या असे म्हणत राजपालने इंडस्ट्रीला काम देण्याची विनंती केली आहे. अधिक बोलताना ते म्हणाले, मी गेल्या ३० वर्षांपासून बॉलिवूडमध्ये आहे. प्रेक्षकांनी मला खूप प्रेम दिले म्हणूनच मी २००-२५० चित्रपट करू शकलो. मनोरंजन क्षेत्राशी माझे रक्ताचे नाते आहे ते मी कधीच विसरणार नाही असे म्हणत ते भावुक झाले.
राजपाल यादव यांनी सोशल मीडियावर मिळालेल्या प्रचंड पाठिंब्याबद्दल त्यांच्या चाहत्यांचे आभार मानले. थकबाकीच्या रकमेपैकी १.५ कोटी रुपये जमा केल्यानंतर त्यांना ही सवलत मिळाली आहे. लवकरच एक मोठी पत्रकार परिषद घेणार असल्याचे संकेत दिले आहेत जिथे ते संपूर्ण वाद आणि तुरुंगातील अनुभवांबद्दल उघडपणे चर्चा करतील. त्यांच्या वकिलांनी असेही सांगितले की, राजपाल कधीही त्यांच्या जबाबदाऱ्यांपासून दूर गेले नाहीत आणि न्यायालयाच्या कोणत्याही निर्देशांचे पालन करण्यास तयार आहेत.

























































