तेव्हा 56 इंचाची छाती कुठे गेली होती असा सवाल देशाची जनता करेल, नरवणे यांच्या पुस्तकावरून राहुल गांधी यांची टीका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दिल्लीतील संसद भवनात लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी माजी लष्करप्रमुख मनोज नरवणे यांच्या पुस्तकातील मजकुराचा संदर्भ देत सरकारवर गंभीर आरोप केले. “हे माझे शब्द नाहीत, तर माजी लष्करप्रमुखांनी त्यांच्या पुस्तकात लिहिलेले आहे,” असे राहुल गांधी यांनी स्पष्ट केले.

राहुल गांधी म्हणाले की, नरवणे यांचे पुस्तक अद्याप प्रकाशित होऊ दिले जात नाही आणि ते धूळ खात पडून आहे. “हे लष्करप्रमुखांचे स्वतःचे मत आहे. सरकारला त्यांच्या दृष्टिकोनाची इतकी भीती का वाटते? त्यांनी काय लिहिले आहे, ते समोर आले तर देश काहीतरी शिकू शकतो,” असेही त्यांनी सांगितले.

“या पुस्तकातून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्याबाबतही माहिती मिळेल. मात्र त्याचबरोबर, देशाच्या राजकीय नेतृत्वाकडून लष्कराला कसे अपयशी ठरवण्यात आले, हेही लोकांसमोर येईल,” असा आरोप राहुल गांधी यांनी केला.

आपल्याला संसदेत बोलू दिले जात नसल्याचा आरोप करत ते म्हणाले, “नरवणे यांनी त्यांच्या पुस्तकात पंतप्रधान मोदी आणि राजनाथ सिंह यांच्याबद्दल स्पष्टपणे लिहिले आहे. त्यातील काही भाग एका लेखात प्रसिद्ध झाला आहे. मी फक्त त्या लेखातील मजकूर उद्धृत करत आहे. तरीही मला बोलू दिले जात नाही.”

राहुल गांधी पुढे म्हणाले, “सरकार घाबरलेले आहे. कारण हे सर्व समोर आले, तर नरेंद्र मोदी आणि राजनाथ सिंह यांची खरी भूमिका देशासमोर उघड होईल. चीन आमच्यासमोर उभा असताना आणि पुढे सरकत असताना, तथाकथित ‘56 इंचाचा छाती’ कुठे गेला होता, हा प्रश्न लोक विचारतील,” असा घणाघात त्यांनी केला.