पहिल्याच पावसात मुंबई गेली खड्डय़ात; नालेसफाई, मेट्रो, रस्त्यांच्या अपूर्ण कामांमुळे बसला फटका

मुंबईत अपूर्ण राहिलेली नालेसफाई, खड्डेमुक्तीसाठी सुरू असलेले रस्त्यांचे क्राँकिटीकरण तसेच मेट्रोच्या रखडलेल्या कामांत सोमवारी झालेल्या अतिवृष्टीने भर घातल्यामुळे मुंबई शहर, पूर्व आणि पश्चिम उपनगरातील रस्ते, पदपथ आणि छोटय़ा गल्लींमधील रस्त्यांचीही अक्षरशः चाळण झाली आहे. मान्सूनच्या पहिल्याच पावसात मुंबईच्या रस्त्यांवर हजारो खड्डे पडले असून त्यातून वाहनचालक आणि पादचाऱ्यांना वाट काढावी लागत आहे. दरम्यान, पडलेल्या खड्डय़ांमुळे दुचाकीसारख्या लहान वाहनांच्या अपघाताचा धोकाही निर्माण झाला आहे.

ते 3 हजार 39 कोटी कुठे खर्च झाले?   

मुंबईत सखल भागात पाणी साचू नये यासाठी मुंबई महापालिकेचे पर्जन्य जलवाहिनी खाते कार्यरत असते. या खात्यांतर्गत मुंबईत पाणी साचू नये यासाठी 2024-25 च्या अर्थसंकल्पात 3 हजार 39 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे,  त्यामुळे या निधीचा नेमका काय उपयोग करण्यात आला, असा सवाल आता करण्यात येत आहे.

पालिका आयुक्त आज घेणार झाडाझडती 

मुंबईत सोमवारी झालेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी उद्या दुपारी पालेका मुख्यालयात अतिरिक्त आयुक्तांसह सहआयुक्त, उपायुक्त, सहाय्यक आयुक्तांची आढावा बैठक घेऊन झाडाझडती घेणार आहेत. मान्सूनपूर्व पाऊस आणि सोमवारी दाखल झालेल्या मान्सूनच्या पावसात महापालिकेच्या सर्व यंत्रणांची दाणादाण उडाली. त्या पार्श्वभूमीवर ही आढावा बैठक वादळी होण्याची शक्यता आहे.

चार कंत्राटदारांना 40 लाखांचा दंड 

सोमवारी झालेल्या अतिवृष्टीवेळी पावसाचे पाणी उपसणारे कंप पूर्ण क्षमतेने सुरू न केल्यामुळे मुंबई महापालिकेने चार कंत्राटदारांना प्रत्येकी 10 लाख असा एपूण 40 लाखांचा दंड केला आहे. हे कंत्राटदार हिंदमाता, गांधी मार्पेट, यलो गेट आणि चुनाभट्टी लघु उदंचन केंद्र चालवणारे कंत्राटदार आहेत.