आमची विमाने पडली कशी? हे महत्त्वाचे! सीडीएस अनिल चौहान यांच्या विधानाने खळबळ

पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याला जोरदार प्रत्युत्तर देताना हिंदुस्थानी लष्कराने ‘ऑपरेशन सिंदूर’ राबविले. ‘ऑपरेशन सिंदूर’ वेळी हिंदुस्थानची सहा लढाऊ विमाने पाडल्याचा पाकिस्तानचा दावा चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (सीडीएस) जनरल अनिल चौहान यांनी फेटाळून लावला आहे. ‘महत्त्वाचा मुद्दा हा नाही की विमाने पडली. महत्त्वाचे हे आहे की, ती कशी पडली? आणि त्यातून काय शिकलो,’ असे ‘सीडीएस’चौहान यांनी म्हटले आहे.

‘सीडीएस’ अनिल चौहान यांनी शनिवारी सिंगापूर येथे ‘ब्लूमबर्ग’ला दिलेल्या मुलाखतीत हे वक्तव्य केले. त्यांच्या वक्तव्याची देशात चर्चा सुरू आहे. संघर्षा दरम्यान, पाकिस्तानने हिंदुस्थानची विमाने पाडली का? तुम्ही याची पुष्टी करू शकता का? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर ‘सीडीएस’चौहान म्हणाले, खरा मुद्दा किती विमाने पडली गेली हा नाही तर ती कशी पडली आणि आम्ही त्यातून काय शिकलो हा आहे.

हिंदुस्थानने आपल्या चुका ओळखल्या आणि तत्काळ तांत्रिक दुरुस्त्या केल्या. कोणत्याही युद्धात नुकसान होत असते, बिगर नुकसानीचे युद्ध होत नाही, अशी पुष्टीही सीडीएस अनिल चौहान यांनी पुढे जोडली.

मोदी सरकार देशाची दिशाभूल करतेय

सीडीएस अनिल चौहान यांनी केलेल्या भाष्यानंतर काँग्रेस पक्ष आक्रमक झाला असून केंद्रातील मोदी सरकार हे देशाची दिशाभूल करत आहे, असा गंभीर आरोप काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केला आहे. केंद्र सरकारने तत्काळ विशेष अधिवेशन बोलवावे, अशी जोरदार मागणीसुद्धा खरगे यांनी केली आहे. आमचे हवाई दलाचे पायलट शत्रूंशी लढताना आपला जीव धोक्यात घालत होते. आपल्याला काही नुकसान झाले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युद्ध टाळले असेल तर ते शिमला कराराचे सरळसरळ उल्लंघन असल्याचे खरगे म्हणाले.

या संघर्षात कधीही अण्वस्त्रे वापरण्याची आवश्यकता नव्हती. आता हिंदुस्थान कोणत्याही रणनीतीशिवाय काहीही करत नाही. पाकिस्तानशी चांगले राजनैतिक संबंध राखण्याचा काळ आता संपला आहे.