
मावळ तालुक्यातील अवैध उत्खनन प्रकरणामुळे महाराष्ट्रभर खळबळ उडालेली आहे. आता अजून एक नवीन प्रकरण बाहेर आलेले आहे. उद्योजक रणजित काकडे यांनी आमदार सुनील शेळके यांच्या कुटुंबीयांच्या मालकीच्या वनीकरणासाठी आरक्षित असलेल्या जमिनीत विना परवाना अनधिकृत उत्खनन करुन हजारो झाडांची कत्तल करण्यात आलेली आहे, असा थेट आरोप केलेला आहे. त्यामुळे आमदार सुनील शेळके यांच्यावर त्वरित कारवाई करणार का? असा सवाल देखील विचारला आहे.
रणजित काकडे म्हणाले आहेत की, नानोली, मावळ येथील गट क्रमांक ७१, १०२, १०३, १०४, १०५, १०८ (पै), १०९, ११०, १११, ११२, ११३, ११५, ११६, १३६, १३८, १३९, १४१ आणि १४२ या जमिनी वनीकरणासाठी आरक्षित श्रेणीत येतात. या जमिनीमध्ये कोणतीही अधिकृत परवानगी न घेता उत्खनन करण्यात आल्याचा दावा रणजित काकडे यांनी केला आहे. या जमिनी आमदार सुनील शेळके यांच्या स्वतःच्या कुटुंबीयांच्या मालकीच्या असून तेथे अनधिकृत उत्खनन केलेले आहे. मावळ तालुक्यातील अवैध उत्खनन प्रकरण नुकतेच अधिवेशनात गाजले. आमदार सुनील शेळके यांनीच या विषयावर लक्षवेधी सूचना मांडली होती आणि त्यावर महसूल विभागाने ताबडतोब मोठी कारवाई केली आहे. चार तहसीलदार आणि दहा तहसील अधिकाऱ्यांचे निलंबन केले. याच पार्श्वभूमीवर आता त्याच आमदार सुनील शेळके यांच्यावर कारवाई महसूल विभाग करणार का? या कथित उत्खनन प्रकरणावर प्रशासनाकडून कोणती भूमिका घेतली जाणार ? सखोल चौकशी होणार का? कायदेशीर कारवाई होईल का? असे अनेक सवाल उपस्थित होत आहेत.
ते पुढे म्हणाले की, आमदार या संविधानिक पदावरील विश्वासाचा गैरफायदा घेवून महसूल मंत्री बावनकुळे यांना चुकीची माहिती आमदार सुनील शंकरराव शेळके यांनी दिली. अशा संविधानिक पदांचा गैरवापर केला म्हणून आमदार सुनिल शंकरराव शेळके राजीनामा देणार का?
































































