महाराष्ट्रात पाऊस सुटीवर, तर ईशान्येकडील राज्यांमध्ये दमदार हजेरी; 20 राज्यांना अलर्ट

महाराष्ट्रात सुमारे 18 दिवस आधीच हजर झालेल्या मॉन्सूनने आगमनाच्या वेळीच राज्यात दमदार बॅटिंग केली. मात्र, आता राज्यात पाऊस 10 दिवसांच्या सुटीवर गेला असून त्याने ईशान्येकडील राज्यात दमदार हजेरी लावली आहे. ईशान्येकडील राज्यात अतिवृष्टीने कहर केला आहे. येत्या काही दिवसात ईशान्येकडील राज्यात पावसाचा जोर वाढणार असून 20 राज्यांना हवामान खात्याने अलर्ट जारी केला आहे. तसेच राज्यात कोकणात काही भागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

ईशान्य भारतात गेल्या चार दिवसांपासून सततच्या मुसळधार पावसामुळे परिस्थिती आणखी बिकट झाली आहे. आसाम, मणिपूर, त्रिपुरा, सिक्कीम, अरुणाचल प्रदेश आणि मेघालय यासह अनेक राज्यांमध्ये पूर आणि भूस्खलनामुळे आतापर्यंत किमान 34 जणांचा मृत्यू झाला आहे. आसाममधील 19 जिल्ह्यांमधील 764 गावे पुरामुळे बाधित आहेत. सुमारे 3.6 लाख लोक प्रभावित झाले आहेत. आसाममध्ये पूर आणि भूस्खलनामुळे आतापर्यंत 10 जणांचा मृत्यू झाला आहे.

यंदा देशासह राज्यात वेळेआधीच मान्सूनचं आगमन झालं आहे. गेल्या काही दिवसांपासून अनेक राज्यांमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. हवामान खात्याकडून काही राज्यांना वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पुढील दोन दिवस पूर्वोत्तर, उत्तर-पश्चिम, दक्षिण आणि मध्य भारतामधील वीस राज्यांना अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर हवामान खात्याने 20 राज्यांना अलर्ट जारी केला आहे.

हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यानुसार आसाम, मणिपूर, मिझोरम आणि त्रिपुरामध्ये अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे, वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तसेच अरुणाचल प्रदेश, पश्चिम बंगाल आणि सिक्किमच्या काही भागांमध्ये देखील जोरदार पावसाचा अंदाज आहे. या राज्यांना रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.
दिल्ली, हरियाणा, पंजाब, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश आणि राजस्थानमध्ये देखील पुढील तीन दिवस विजांच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. पुढील 24 तासांमध्ये या राज्यांत अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.

उत्तराखंडमध्ये चार जूनपर्यंत वेगवेगळ्या भागांमध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे, तर पंजाब आणि हरियाणामध्ये तीन जून रोजी मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. केरळ, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्येही अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. महाराष्ट्राला देखील पावसाचा इशारा देण्यात आला असून कोकण आणि विदर्भात वादळी वाऱ्यासह पाऊस होऊ शकतो, असं हवामान विभागाने म्हटलं आहे. बिहारमध्ये देखील पावसाचा इशारा देण्यात आला आहे.