
केंद्र सरकारच्या वार्षिक स्वच्छता सर्वेक्षणामध्ये मध्य प्रदेशमधील इंदूरने पुन्हा एकदा बाजी मारली. इंदूरने सलग आठव्यांदा देशातील सर्वात स्वच्छ शहराचा मान पटकावला, तर या क्रमवारीत गुजरातमधील सुरत हे दुसऱ्या क्रमांकावर राहिले. महाराष्ट्रातील नवी मुंबई शहराने देशातील सर्वात स्वच्छ शहरांमध्ये तिसरा क्रमांक पटकावला.
स्वच्छता सर्वेक्षणाचा निकाल गुरुवारी जाहीर करण्यात आला. यामध्ये विविध वर्गवारीनुसार स्वच्छ शहरांची घोषणा करण्यात आली. यात इंदूर, सुरत आणि नवी मुंबई या शहरांनी बाजी मारली. त्याशिवाय तीन ते दहा लाख लोकसंख्या असलेल्या गटामध्ये उत्तर प्रदेशमधील नोएडा या शहराने पहिला क्रमांक पटकावला. या गटामध्ये चंदिगड दुसऱ्या आणि म्हैसूर तिसऱ्या क्रमांकावर राहिले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी नवी दिल्लीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमामध्ये विजेत्यांना स्वच्छता सर्वेक्षण 2024-25 या वर्षासाठीचे पुरस्कार प्रदान केले. या वेळी केंद्रीय मंत्री आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
l नागरिकांच्या अभिप्राय श्रेणीमध्ये चंद्रपूरने सर्वोत्कृष्ट शहराचा पुरस्कार जिंकून 3 ते 10 लाख लोकसंख्या विभागात ठसा उमटवला, तर लातूरला त्याच श्रेणीत सर्वोत्तम घनकचरा व्यवस्थापनासाठी गौरवण्यात आले.
l देशभरात स्वच्छ भारत अभियान मागील नऊ वर्षांपासून राबवले जाते. 2016 साली 73 शहरांसाठी अभियान राबवले जाते होते. त्यानंतर हे अभियान 4500 शहरांपर्यंत पोहोचले. 45 दिवस चाललेल्या या मूल्यांकनामध्ये तीन हजारांहून अधिक प्रशिक्षित कर्मचाऱ्यांनी भेट दिली.