उत्तर प्रदेशातील जौनपूरमध्ये गावकऱ्यांनी महाराष्ट्र पोलिसांना ओलीस ठेवले, जाणून घ्या काय आहे प्रकरण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उत्तर प्रदेशातील जौनपूर जिल्ह्यात गुरुवारी रात्री एका अफवेमुळे मोठा गोंधळ उडाला. मुंबईहून एका आरोपीचा शोध घेण्यासाठी आलेल्या महाराष्ट्र पोलिसांच्या पथकाला गावकऱ्यांनी चोर समजून ओलीस ठेवले. या घटनेमुळे रीठी गावात रात्री उशिरापर्यंत तणावाचे वातावरण होते.

नेमके काय घडले?

मुंबईतील पैशांच्या व्यवहारातील एका आरोपीचा शोध घेण्यासाठी महाराष्ट्र पोलिसांचे एक पथक जौनपूरमधील सिकरारा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रीठी गावात पोहोचले होते. आरोपीचे लोकेशन या गावात मिळाल्याने पोलीस साध्या वेशात तिथे तपास करत होते. मात्र रात्रीच्या अंधारात साध्या कपड्यातील अनोळखी व्यक्तींना पाहून गावकऱ्यांना संशय आला. गावात चोर शिरल्याची अफवा पसरली आणि पाहता पाहता मोठा जनसमुदाय तिथे जमा झाला.

गावकऱ्यांनी पोलिसांना घेरल्यानंतर पथकातील तीन पोलिसकर्मी स्वतःचा जीव वाचवण्यासाठी पळू लागले. मात्र संतापलेल्या गावकऱ्यांनी त्यांचा पाठलाग करून त्यांना पकडले आणि एका ठिकाणी बसवून ठेवले. पोलिसांनी आपण महाराष्ट्र पोलीस असल्याचे वारंवार सांगितले, तरीही गावकऱ्यांनी त्यांच्यावर विश्वास ठेवला नाही आणि त्यांना बंधक बनवून ठेवले.

या घटनेची माहिती मिळताच स्थानिक सिकरारा पोलीस ठाण्याचे पथक तातडीने घटनास्थळी पोहोचले. त्यांनी गावकऱ्यांची समजूत काढली आणि ओलीस ठेवलेल्या महाराष्ट्र पोलिसांची ओळख पटवून त्यांची सुटका केली. गावकऱ्यांमधील अंधश्रद्धा आणि चोरीच्या अफवेमुळे हा सर्व प्रकार घडल्याचे समोर आले आहे. सुदैवाने या घटनेत कोणालाही गंभीर दुखापत झाली नाही. स्थानिक पोलिसांनी गावकऱ्यांना शांत करून प्रकरण मिटवले आहे.