
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने नागरिकांवर अचानक घनकचरा उपयोगकर्ता करवाढ लादली आहे. छुपाछुपी दुप्पट केलेला टॅक्स रद्द करण्यासाठी आज शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने केडीएमसी मुख्यालयावर धडक दिली. हजारो शिवसैनिकांनी मुख्यालयाचा प्रवेशद्वार तोडून आयुक्त कार्यालयात प्रवेश केला. कचरा संकलन करवाढ रद्द करण्याच्या घोषणांनी कल्याणचा छत्रपती शिवाजी महाराज चौक ते केडीएमसी मुख्यालयापर्यंतचा परिसर गगनभेदी घोषणांनी दणाणून सोडला. हजारो शिवसैनिकांचा एल्गार पाहता पालिका प्रशासन करवाढ मागे घेण्याबाबत विचार केला जाईल, असे आश्वासन दिले. या मोर्चात काँग्रेस, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकत्यांसह नागरिकही उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. महापालिकेने काही दिवसांपूर्वी एक अध्यादेश काढून घर, दुकान, हॉटेल, हॉस्पिटल अशा सर्वच प्रकारच्या आस्थापनांवरील घनकचरा शुल्कात तब्बल दुप्पटीने वाढ केली आहे.
ही वाढ नागरिकांना कोणतीही सेवा न देता केवळ आर्थिक लूट करत असल्याचा आरोप कल्याण जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचा मोर्चा आज पालिकेवर धडकला. कल्याण पश्चिमेतील छत्रपती शिवाजी महाराज चौकातून निघालेला मोर्चा पालिका मुख्यालयावर येताच पोलिसांनी अडवला. आक्रमक झालेल्या शिवसैनिकांनी मुख्यालयाचे प्रवेशद्वार तोडून आतमध्ये प्रवेश केला. शिवसैनिकांचा जत्था थेट आयक्त अभिनव गोयल यांच्या केबिनपर्यंत धडकला.
आंदोलनात कल्याण लोकसभा सभा संपर्कप्रमुख, , उपने उपनेते गुरुनाथ खोत, विजय साळवी, अल्ताफ शेख, भिवंडी लोकसभा संपर्कप्रमुख साईनाथ तारे, कल्याण जिल्हाप्रमुख धनंजय बोडारे, माजी महापौर रमेश जाधव, प्रकाश म्हात्रे, शहरप्रमुख बाळा परब, शरद पाटील, अभिजित सावंत, प्रकाश तेलगोटे, जिल्हा संघटक तात्या माने, उपजिल्हाप्रमुख राहुल भगत, रुपेश भोईर, प्रतीक पाटील, महिला संघटक वैशाली दरेकर, रेखा कणटे, मीनल कांबळी, सुजाता धारगळकर, सुनिता लेकावळे, नारायण पाटील, विजय काटकर, वंडार कारभारी, शाम चौगले, दत्ता खंडागळे, प्रथमेश पुण्यार्थी, सुरेश पवार, शांताराम डिगे, सुरेश सोनार, जगदीश तरे, अॅड. नीरज कुमार, अनिल डेरे, सचिन जोशी, आसीफ शेख, अस्लम शेख, दत्ता नार्वेकर, गंबाजी लाड, काँग्रेसचे संतोष केणे, एकनाथ म्हात्रे, प्रमोद कांबळे, राष्ट्रवादी शरचंद्र पवार पक्षाचे राजू शिंदे, भालचंद्र पाटील आदी सहभागी झाले होते.
मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलेले साडेसहा हजार कोटी आधी मागून घ्या !
करवाढ कशी अयोग्य आहे हे आयुक्त गोयल यांना शिवसेनेच्या शिष्टमंडळाने सांगितले. यावेळी बोलताना जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे यांनी कल्याण-डोंबिवलीकर नागरिक कोणत्याही प्रकारचा वाढीव कर देणार नाही, असे स्पष्टपणे बजावले. जर तुम्हाला पैसे हवे असतील तर केंद्र सरकारकडून मागावे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वीच साडेसहा हजार कोटी रुपये देण्याचे आश्वासन कल्याण-डोंबिवलीतील नागरिकांना दिले होते. त्यांच्याकडून त्या निधीची मागणी करावी असा आग्रह धरला. करवाढ रद्द झाली नाही तर शिवसेना यापेक्षाही तीव्र आंदोलन करेल, असा इशाराही त्यांनी दिला.
असा लादला बोजा
केडीएमसी यापूर्वी घनकचरा शुल्क प्रती घर वार्षिक 600 रुपये घेत होते. आता 900 रुपये केले आहेत. दुकाने, दवाखान्यांसाठी 720 रुपये घेतले जात होते ते आता 1440 केले आहेत. 50 खाटांपेक्षा मोठ्या रुग्णालयांसाठी पूर्वी 2160 घेतले जात होते ते आता 4320 करण्यात आले आहेत. शोरूम, फर्निचर, ऑटो मोबाईल, इलेक्ट्रॉनिक्ससाठी 1440 रुपये घेतले जात होते. ते आता 2880 केले आहेत. गोदामांसाठी 1440 रुपये घेतले जात होते. ते आता 2880 केले आहेत. उपाहारगृहे व हॉटेलसाठी 14,400 ते 17,280 शुल्क करण्यात आले आहे. लॉजिंगसाठी 19,360 तर मंगल कार्यालये, चित्रपटगृह, मॉल आदींना 84 हजार ते 96 हजारपर्यंत करवाढ लादली आहे.