लातूर – धारदार शस्त्राने पत्नीचा गळा कापला

लातूरमध्ये धारदार शस्त्राने पत्नीचा गळा चिरून खून केल्याची घटना घडली आहे. ही घटना शहरातील बार्शी रोडवरील अवंतीनगर भागात मंगळवारी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास घडली. त्यानंतर पती फरार झाला. या घटनेने खळबळ उडाली असून या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खून करणाऱ्यासस अटक करण्यात आली आहे.

शहरातील अवंतीनगर भागातील रेश्मा अब्दुल शेख (वय 22) हिचा विवाह तीन वर्षांपूर्वी विवेकानंद चौक भागात राहणाऱ्या तरुणाशी झाला होता. गेल्या दोन वर्षांपासून पती-पत्नीत सातत्याने वाद होत असे. एवढेच नव्हे तर पती रेश्माचा सातत्याने छळ करायचा. या छळाला कंटाळून रेश्मा अब्दुल शेख आपल्या 2 वर्षाच्या बाळासह आई-वडिलांकडे अवंतीनगर येथे राहात होती. मंगळवारी तिचा पती सासरी आला आणि सायंकाळच्या सुमारास घरी एकटीच असल्याचे पाहून त्याने तिच्यावर चाकूने सपासप वार केले आणि गळा चिरून तिची हत्या केली. त्यामुळे ती रक्ताच्या थारोळ्यात पडली. त्यानंतर पती फरार झाला. याची आजूबाजूला कसलीच कुणकुण नव्हती. मात्र रक्ताने माखलेले लहान बाळ घरातून बाहेर आले. ते पाहिल्यानंतर गल्लीतील काही लोकांनी घरात जाऊन पाहिले असता रेश्मा रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिसून आली.

या प्रकरणाची माहिती एमआयडीसी पोलीस ठाण्यात देताच पोलीसही घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा करून उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह शासकीय रुग्णालयात पाठवून देण्यात आला. जावई आपल्या मुलीचा सातत्याने छळ करीत होता. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात अनेकदा तक्रार दिली. परंतु या तक्रारीची दखल घेतली गेली नाही. त्यामुळे माझ्या मुलीचा जीव गेला अन्यथा माझी मुलगी वाचली असते, असा आरोप रेश्माच्या वडिलांनी केला. दरम्यान पोलीसांनी रात्रीच खून करून पळालेल्या अब्दुल यास अटक केली आहे.