माधुरी परत येणार! कोल्हापूरवासीयांच्या लढ्याला यश, वनतारा करणार पाठवणी

नांदणी मठातील माधुरी तथा महादेवी हत्तीण गुजरातच्या ‘वनतारा’मधून परत आणण्याची मागणी करत कोल्हापूरकरांनी तीव्र आंदोलन केले. त्याला यश आले असून माधुरीची परत पाठवणी करण्यासाठी वनताराने सकारात्मक भूमिका घेतली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज वनताराच्या वरिष्ठ अधिकाऱयांसोबत चर्चा केली. राज्य सरकार नांदणी मठ व कोल्हापूरवासीयांच्या पाठीशी असून, माधुरीला परत देण्याच्या संदर्भात राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात भूमिका मांडेल असे देवेंद्र फडणवीस यांनी या बैठकीनंतर स्पष्ट केले.

गुजरातमधील वनतारा पशुसंवर्धन पेंद्राच्या अधिकाऱयांशी झालेल्या बैठकीची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक्सवरील पोस्टच्या माध्यमातून दिली आहे. महादेवी हत्तीण (माधुरी) पुन्हा सुखरूप नांदणी मठाकडे परत देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने जी याचिका करण्याचे ठरविले. त्यात सहभागी होण्याचा निर्णय वनताराने घेतला असल्याचे त्यांनी मला आश्वस्त केल्याचे मुख्यमंत्र्यांनी त्यात नमूद केले.

आम्ही केवळ सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे पालन केले आणि महादेवी हत्तिणीचा ताबा घेण्याचा आमचा कुठलाही प्रयत्न नव्हता, असे वनताराच्या अधिकाऱयांनी सांगितल्याचेही मुख्यमंत्र्यांनी पुढे म्हटले आहे.

कोल्हापुरातही बैठक

स्थानिक प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि वनताराच्या अधिकाऱयांचीही आज कोल्हापुरात बैठक झाली. या बैठकीत माधुरीला स्वगृही आणण्याचा निर्णय झाला. ‘माधुरी’ला परत आणण्यासाठी राज्य सरकार, मठ प्रशासन आणि वनतारा हत्ती संगोपन पेंद्र सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करण्यावरही यावेळी एकमत झाले.

पुनर्वसन केंद्र उभारण्यासही हातभार

नांदणी मठानजीक वन विभागाने निवडलेल्या जागेवर या महादेवी हत्तिणीसाठी पुनर्वसन केंद्र उभारण्यास राज्य सरकारला सर्वतोपरी मदत करण्याची तयारीसुद्धा ‘वनतारा’ने दर्शविली आहे. विविध समाजांच्या धार्मिक भावनांचा आम्ही सन्मानच करतो, असेही त्यांनी सांगितले.