
वीस दिवसांपूर्वीच लोकार्पण झालेल्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाच्या इगतपुरी ते आमणे या अंतिम टप्प्यात शहापूरजवळ रस्त्यावर खड्डे पडले होते अशी जाहीर कबुली आज महायुती सरकारने दिली. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने त्यासंदर्भात आज स्पष्टीकरण दिले.
5 जून रोजीच या अंतिम टप्प्याचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार व एकनाथ शिंदे यांनी मोठा गाजावाजा करत केले होते. त्या रस्त्यावरून तिघांनी गाडीतून प्रवासही केला होता; परंतु शहापूरजवळील पुलावर खड्डे पडल्याची छायाचित्रे दक्ष नागरिकांनी काढून प्रसारमाध्यमांना दिली होती. ते वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर आज सरकारचे धाबे दणाणले.
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने 24 जून रोजी झालेल्या मुसळधार पावसामुळे शहापूरच्या पुलावर सात ठिकाणी खड्डे पडल्याचा दावा केला. ते खड्डे तातडीने भरण्यात आल्याचेही सांगण्यात आले. 76 किलोमीटरच्या या टप्प्यात फक्त एक चौरस मीटर क्षेत्रफळामध्येच खड्डे पडणे अतिशय नगण्य आहे, असे बेजबाबदार विधानही महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या कार्यकारी अभियंत्यांनी केले आहे.
…म्हणून भ्रष्टनाथ शिंदे पळून वॉशिंग मशीन पार्टीत गेले – आदित्य ठाकरे
शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी समृद्धीवरील खड्डय़ांची बातमी इन्स्टाग्रामवर शेअर करून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे. ‘समृध्दी महामार्गावर फक्त खड्डेच खड्डे आहेत. कुठेही हा मार्ग सरळ नाही. यामुळेच भ्रष्टनाथ शिंदे शिवसेनेतून पळ काढून वॉशिंग मशीन पार्टीत गेले. काही आठवडय़ांपूर्वीच समृद्धीच्या इगतपुरी-आमणे टप्प्याचे उद्घाटन झाले होते. तिथेही खड्डे पडले. हे आहे महाराष्ट्रातील भाजप सरकार.’ असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे.